... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 04:05 PM2020-09-18T16:05:06+5:302020-09-18T16:09:53+5:30

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता.

... Therefore, the foundation stone laying program at Indu Mills has been canceled, the explanation given by the Chief Minister uddhav thackery | ... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

... म्हणून इंदू मिलमधील पायाभरणी कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण 

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुंबई - बहुचर्चित इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेच्या वादावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आंबेडकर चळवळीतील नेत्यांना कार्यक्रमाचं आमंत्रण न दिल्याने वाद निर्माण झाला होता. आज दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम इंदू मिल येथे होणार होता. आता, कार्यक्रम रद्द झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय. तसेच, याप्रकरणी कुणीही राजकारण करू नये, असा टोलाही लगावला. 

मुंबई येथील इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य दिव्य स्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमाला केवळ १६ जणांनाच आमंत्रण दिले गेले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, महापौर, स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अधिकारी हे उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी केवळ 16 जणांना बोलवण्यात आले होते, त्यात बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील कोणालाही आमंत्रित न केल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकचं नाही तर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नव्हतं. 

इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एमएमआरडीएनेही राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मात्र, अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे. हे मी लक्षात आणून दिले. त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांनाही निमंत्रण नाही

पायाभरणी कार्याक्रमासाठी कोणाला बोलवायचं हा सर्वस्वी निर्णय सरकारचा असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी निमंत्रण न दिल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळी १० वाजता आनंदराज आंबेडकर यांना एमएमआरडीए निमंत्रण दिलं. इंदू मिलच्या आंदोलनपासून प्रत्येक कार्यक्रमात आमचा सहभाग होता. त्यानंतर या स्मारकातील निकृष्ट बांधकामाबाबत आवाज उठवला होता, त्यामुळे निमंत्रण देण्यात आलं नाही, या संपूर्ण कामाची गुणवत्ता सरकारने तपासावी असं आनंदराज आंबेडकरांनी मागणी केली आहे.

अजित पवार वाशीहून परत फिरले

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अजितदादा पुण्याहून मुंबईसाठी येत होते. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम होणार होता. मात्र अचानक हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती MMRDA ने दिली. त्यामुळे वाशीपर्यंत पोहचलेले अजित पवार पुन्हा यु-टर्न घेत पुण्याच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, आज सकाळी 6 वाजता अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर कोविड 19 बाबत अधिकाऱ्यांची बैठक अजितदादांनी घेतली.

Web Title: ... Therefore, the foundation stone laying program at Indu Mills has been canceled, the explanation given by the Chief Minister uddhav thackery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.