Join us  

राष्ट्रवादीच्या पुराव्याची शेलारांनी केली चिरफाड; मग जितेंद्र आव्हाडांना "भोंदूबाबा" म्हणावे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 5:03 PM

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात हा घ्या पुरावा म्हणून राष्ट्रवादीने ट्विट केलं होतं.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या घोळावरुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न कोणताही राजकीय पक्ष करत नाही. शिवसेना-भाजपा यांच्यातील सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. अदृश्य शक्ती या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांनी आशिष शेलारांना टोला लगावला होता. त्यावर शेलारांनीही आव्हाडांना चिमटा काढला आहे. 

आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात हा घ्या पुरावा म्हणून राष्ट्रवादीने ट्विट केलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देत आशिष शेलार म्हणाले की. माझ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका फँशन डिझाइनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना "भोंदूबाबा" म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हास्यास्पदच आहे हे सारे अशा शब्दात आशिष शेलारांनी आव्हाडांवर पलटवार केला आहे. 

या फॅशन डिझाइनरचं नाव फिरोज शकीर असं आहे. गेल्या ४० वर्षापासून ते बॉलिवूडमध्ये काम करतात. आशिष शेलार आणि फिरोज शकीर हे एकाच इमारतीत राहण्यास आहेत. मी तांत्रिक नव्हे असं स्पष्टीकरण फिरोज शकीर यांनी केलं आहे. 

युतीतील जागावाटपाबाबत अमित शहा यांनी चर्चेची माहिती नरेंद्र मोदी यांना न देता त्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आशिष शेलार म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विसंवाद निर्माण करण्यासाठी रोज एकपात्री वगनाटयाचा प्रयोग सुरू आहे. संजय राउत यांनी अमित शहा, पंतप्रधान मोदी यांना शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितले होते. 

त्याचसोबत मोदी आणि बाळासाहेबांचे एक खास नाते होते. हे नाते मोदी पंतप्रधान होण्याआधीपासूनचे होते. मात्र आता एक अदृश्य शक्ती मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फूट पाडू इच्छित असल्याचे शेलार म्हणाले. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळत असल्याचं चित्र असल्याने आशिष शेलारांचा हा टोला विरोधकांनाही होताच त्यामुळे शेलारांना जितेंद्र आव्हाडांनी टोला लगावला. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, कदाचित ते मांत्रिकांच्या संपर्कात असतील, तंत्रमंत्र केलं असेल, त्याने सांगितलं असेल अदृश्य शक्ती येईल मात्र या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, आमच्या मनात शक्ती आहे, प्रचंड बलवान आणि एकनिष्ठ अशा शक्ती असतात. स्वत:चे विचार त्याच विश्वासावर आम्ही पुढे जातो असं विधान केलं होतं.  

टॅग्स :आशीष शेलारजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाशिवसेना