राऊतांच्या घरी रेकी करण्याच्या आरोपामागे सत्य भलतेच निघाले; ८ तपास पथके नेमली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:33 IST2024-12-21T13:30:07+5:302024-12-21T13:33:04+5:30
राऊत बंधू अशाच कोणत्याही स्वत:च्याच कार्यकर्त्याला पाठवून असं करतात. संजय राऊतांना मारून कुणी हात खराब करून घेणार नाही असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.

राऊतांच्या घरी रेकी करण्याच्या आरोपामागे सत्य भलतेच निघाले; ८ तपास पथके नेमली, मग...
मुंबई - ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याचा दावा विरोधकांनी केला. याबाबत समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ संशयित दुचाकीवरून येत मोबाईलमध्ये फोटो काढत असल्याचा आरोप झाला. विधिमंडळातही ठाकरे गटाच्या आमदारांनी याबाबत मुद्दा उचलून धरला. आता पोलीस तपासात या २ संशयितांबाबत भलतेच सत्य समोर आले आहे.
संजय राऊतांच्या आरोपानंतर रेकी करणारे दोन जणांचा पोलिसांनी शोध घेतला. त्या दोघांची चौकशी केली असता ते दोघे मोबाईल टॉवरची रेंज तपासण्यासाठी आल्याचं सिद्ध झाले. याबाबत परिमंडल ७ चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी म्हटलं की, आमच्याकडे माहिती आल्यानंतर याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या ८ टीम बनवल्या होत्या आणि जी माहिती समोर त्याची पडताळणी केली. त्यानंतर तपासात हे दोघं तरूण मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट करण्यासाठी आलेले कामगार होते. ते आपले काम करत होते. ते तिथे टेस्ट करण्यासाठी आले होते. आम्ही काल दिवसभरात या माहितीची खातरजमा करून पाहिली तेव्हा हे कामगार असल्याचं निष्पन्न झालं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही ज्या ८ टीम बनवल्या, त्यांच्याकडून या २ तरूणांना ट्रेस करण्यात आले. सीसीटीव्हीच्या आधारे या संशयितांचा शोध घेऊन त्यांना ठाणे कापूरबावडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याची खातरजमा करून घेण्यात आली. सेलप्लॅन व इन्स्टा आयसीटी सोल्युशन कंपनी ही मोबाईल नेटवर्कची पडताळणी करते, त्या भागात नेटवर्कची चाचणी करतात. या दोघांकडे ८-९ मोबाईल होते. एका लॅपटॉपच्या माध्यमातून ठिकठिकाणी मोबाईल नेटवर्क कसं आहे. तिथे डेटा पोहचतो त्याची चाचणी करतात असं पोलीस उपायुक्त विजयकांत सांगर यांनी म्हटलं.
दरम्यान, मच्छर मारण्यासाठी पण रेकी करावी लागते असं मी ऐकले. कदाचित खिचडी चोर कुठे राहतो हे कुणीतरी पाहायला आलं असेल. मच्छर मारण्यासाठी कुणी रेकी करत नाही. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज नाही. संजय राऊत महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात तेवढा काही महत्त्वाचा नाही. राऊत बंधू अशाच कोणत्याही स्वत:च्याच कार्यकर्त्याला पाठवून असं करतात. संजय राऊतांना मारून कुणी हात खराब करून घेणार नाही असा खोचक टोला मंत्री नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला.