ठाकरे गटाला होम ग्राऊंडवरच धक्का! वांद्रेतील नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र; केला जय महाराष्ट्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:29 IST2025-02-17T17:26:51+5:302025-02-17T17:29:18+5:30
Shiv Sena Uddhav Thackeray Group: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन हेच नेते मातोश्रीवर आले होते. यानंतर आता साहेब मला माफ करा, अजून किती दिवस सहन करायचे, असे सांगत पदाचा राजीनामा दिला.

ठाकरे गटाला होम ग्राऊंडवरच धक्का! वांद्रेतील नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र; केला जय महाराष्ट्र
Shiv Sena Uddhav Thackeray Group: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे भागातील एका नेत्याने पत्र लिहिले असून, पक्षाला जय महाराष्ट्र करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर पहिली मशाल घेऊन शिवसैनिक जितेंद्र जानावळे हे मातोश्रीवर आले होते. विभाग प्रमुख अनिल परब यांनी आपल्याला कार्यक्षेत्राच्या बाहेर ठेवल्याचा आरोप करत जानावळे यांनी उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र लिहिले आहे.
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?
मी आपणाकडे शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा देत आहे. गेली ६ वर्ष मला माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करून माझी राजकीय गोची करण्याचे षड्यंत्र विभागातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. गेल्या पालिका निवडणुकीत मी नोकरी घर सोडून भाजपाच्या विरोधात निवडणूक जोमाने लढलो. अवघ्या थोड्याच मतांनी हरलो, पण खचलो नाही आणि परत जिद्दीने माझे संघटनात्मक जनसेवेचे, रुग्णसेवेचे काम विभागात चालू ठेवले डोक्यात एकच विचार होता एकदा तरी विलेपार्ले विधानसभेतील माझ्या वॉर्ड ७१ मध्ये विजयाचा भगवा फडकविणार पण दुर्दैव मला विभागप्रमुख मा अनिल परब यांनी गेली ६ वर्ष विभागातून बाजूच्या विधानसभेत म्हणजे बाहेर ठेवले वारंवार विभागप्रमुख अनिल परब यांना विभागात परत घेण्याची विनंती मी केली. पण त्यांनी फक्त तारखाच दिल्या आणि निराशा केली. एवढेच नाही तर मी वास्तव्यास असलेल्या असलेल्या विले पार्ले विधानसभेच्या बैठकींना मी स्थानिक पदाधिकारी नसल्यामुळे मला अपमान ही सोसावा लागला. हे सर्व मला डावलण्याचे प्रकार माझ्या सोबत जाणूनबुजून होत होते हे मला जाणवत होते. तरी ही मी सहा वर्ष संयम ठेऊन संघटना वाढीसाठी काम करीत राहिलो, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, याबाबत मी आपल्याला आणि आदित्य ठाकरे यांना मातोश्री येथे प्रत्यक्ष भेटून विभागात चुकीच्या पद्धतीने चाललेल्या संघटनात्मक पद्धतीची व्यथा मांडली परंतु आपणाकडून ह्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. आंदोलनात पुढे असणारा, पोलिसांच्या लाठ्या खाणारा, आंदोलनाच्या केसेसबाबत कोर्टात फेऱ्या मारणाऱ्या माझ्या सारख्या संघटनात्मक व सामाजिक करणाऱ्या शिवसैनिकाची जर ही परिस्थिती होत असेल तर नेमका निकष काय लावला ? हा प्रश्न मनाला भेडसावतो. या सर्व संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो असून मला कोणाच्या दबावाखाली आणि कार्यरत असलेल्या विभागाच्या बाहेर पदाधिकारी म्हणून काम करायला एक शिवसैनिक म्हणून जमणार नाही. माझी क्षमता असतानाही मला डावलण्यात येते हे मी किती दिवस सहन करायचे हा विचार करत बसण्यापेक्षा मी माझ्या "उपविभागप्रमुख" पदाचा राजीनामा जड अंतःकरणाने आपणाकडे या पत्राद्वारे देत आहे. साहेब मला माफ करा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
“साहेब माफ करा” संघटनात्मक चुकीच्या पद्धतीला मी कंटाळलो आहे मी राजीनामा देत आहे.@uddhavthackeray@AUThackeraypic.twitter.com/sNA3qFwtbB
— jitendra janawale (@jitujanawale) February 17, 2025