Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:07 IST2025-06-19T16:02:44+5:302025-06-19T16:07:52+5:30
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय असलेल्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणीचं नाव संध्या पाठक असं असून, ती २१ वर्षांची होती.

Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मुंबईतील प्रतिष्ठित महाविद्यालय असलेल्या विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या तरुणीचं नाव संध्या पाठक असं असून, ती २१ वर्षांची होती. संध्या हिने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपल्याचं सांगण्यात येत आहे. कॉलेज प्रशासनानेही ही आत्महत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र तिच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करत संध्या हिला कुणीतरी धक्का देऊन खाली ढकलले, असा दावा केला आहे. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
विले पार्ले येथे असलेल्या साठे कॉलेजमध्ये आज सकाळी अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या संध्या पाठक या २१ वर्षीय विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीव संपवले. ही घटना घडल्यानंतर महाविद्यालयामध्ये एकच खळबळ उडाली. संध्या हिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
दरम्यान, कॉलेज प्रशासनाने याबाबत संध्या हिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची त्यांना माहिती दिली. मात्र मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी कॉलेज प्रशासनाकडून दिलेल्या माहितीबाबत शंका घेत संध्या हिला कुणीतरी धक्का देऊन खाली पाडले असावे, असा संशय व्यक्त केला आहे.
२१ वर्षीय संध्या हिने टोकाचं पाऊल उचलत जीवन का संपवलं असावं? तिने तिसऱ्या मजल्या वरून उडी मारली की पडली, की तिला कुणी तरी धक्का देऊन खाली पाडलं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.