Join us  

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: September 21, 2020 4:36 PM

राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे.

मुंबई: कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. यानंतर मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर या रेल्वे स्थानकावरुन अनेक मनसैनिकांनी लोकलने प्रवास करुन आंदोलन केले. मात्र आता मनसेच्या या सविनय कायदेभंग आंदोलनावर ठाकरे सरकारने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनावर भाष्य केलं आहे. मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी रेल्वे बंद केली आहे. त्यामुळे मनसेनं राज्यातील आणि मुंबईतील कोरोनाची परिस्थिती एकदा समजून घ्यावी, असा सल्ला अशोक चव्हाण यांनी दिला आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलने प्रवास करून आंदोलन केले. संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लोकल सुरु करा. बसमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे, अशी अनेकवेळा राज्य सरकारकडे मागणी केली होती. बसमधून प्रवास केल्यास कोरोना पसरत नाही. मात्र रेल्वेने प्रवास केल्यास कोरोना पसरतो असा सरकारचा समज आहे. त्यामुळे आज आम्ही सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आम्ही नाकावर टिच्चून हा रेल्वे प्रवास करत आहोत, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले.

आंदोलनाबाबत काय म्हणाले होते संदीप देशपांडे-

'रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल' असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता. देशपांडे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले होते. तसेच 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही सरकारला केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळत होते.

लोकल सेवा सुरु करण्याची मागणी रास्त, पण- राजेश टोपे

लोकल सेवा सुरु करण्याची मागणी रास्त आहे. पण लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन शक्य नाही. सध्या हे धोक्याचं ठरु शकतं. लोकल ट्रेन सुरु करण्यासंबंधी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्यास तयार- मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक

मुंबई उपनगरीय लोकलसेवा सुरू करण्यास रेल्वे तयार आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी त्याबाबत आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली व त्यास अनुमती मिळाली तर आम्ही लगेचच लोकलसेवा पूर्ववत करू, असे नमूद करण्यात आले आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

"पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच"

Video: मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी; मनसैनिकांचा 'लोकल'ने प्रवास

राजस्थान रॉयल्सला धक्का; बेन स्टोक्ससह संघातील 3 तगडे खेळाडू पहिल्याच सामन्याला मुकणार

टॅग्स :राज ठाकरेमनसेअशोक चव्हाणलोकलमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस