Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 12:22 IST2025-06-14T12:19:59+5:302025-06-14T12:22:37+5:30
Sanjay Raut on Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यावर काही मिनिटांतच ते कोसळलं. मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?" असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
"ड्रीमलायनरच्या अपघाताची चौकशी सुरू आहे. लोकांच्या मनात ज्या शंका आहेत, त्यासंदर्भात देश-विदेशातील एजन्सी एकत्र तपास करत आहेत. ड्रीमलायनरचा व्यवहार झाला होता तेव्हा भाजपाने त्याच्या क्षमतेविषयी, इंजिनाविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. कारण यूपीए सरकारच्या काळात ही खरेदी झाली. नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना तेव्हा वारंवार खुलासा करावा लागत होता. अपघात झाल्यावर तपास सुरू आहे. मुळात हा अपघात झाला कसा? हे सिव्हिल एव्हिएशनला क्षेत्राला पडलेले कोडं आहे."
"कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
"३० सेकंदामध्ये हे घडलं कसं? एकाच वेळेला दोन इंजिन कशी बंद पडली? कोणी सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. आपण त्यातले एक्सपर्ट नाही. पण शत्रू राष्ट्राकडून आपल्या देशावर जे सायबर हल्ले होत आहेत. ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपली यंत्रणा ठप्प केली जाते. या सगळ्याचा तपास एजन्सी करत असेल तर त्यावर फार चर्चा करणंयोग्य नाही. दुर्दैवाने ३०० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. एक्स्पर्ट वेगवेगळे अँगल्स देत आहेत, त्याचा तपास होईल" असं राऊत म्हणाले.
"अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे?"
"माझ्या मनात काही शंका आहेत. त्या शंका आता उघडपणे बोलून गोंधळ निर्माण करणं बरोबर नाही. विविध क्षेत्रातून माहिती आमच्याकडे सुद्धा येत असते. मुळात मेंटेनन्स हा विषय आहे. अहमदाबाद एअरपोर्ट जिथून हे विमान उडायला परवानगी दिली. तिथे ज्या मेंटेनन्स, इंजिनियरिंग संस्था आहेत, एटीसीमध्ये क्षमतेपेक्षा ५६ टक्के माणसे कमी आहेत. ज्यांच्याकडून विमानाच्या सुरक्षेची सगळ्यात जास्त जबाबदारीची आपण अपेक्षा करतो. तिथेच माणसे कमी आहेत. ते का आणि कशासाठी? अहमदाबाद एअरपोर्ट कोणाच्या ताब्यात आहे? अहमदाबाद एअरपोर्टवर विमानांच्या मेंटेनेसची जबाबदारी कोणावर आहे? या सगळ्या गोष्टींवर प्रवाशांच्या मनात संशय आहे. हा संशय असाच राहिला तर विमानातून प्रवास करणाऱ्यांची संख्या घटेल."
"कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसत नव्हता"
"काल मंत्री त्या मृत्यूच्या ढिगाऱ्यावर उभे राहून ज्या पद्धतीने वागत होते, त्याला रील बनवणं म्हणतात. त्यांच्या कोणाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश दिसत नव्हता. आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत की, महाराष्ट्रातील २० च्या आसपास लोक मरण पावले आहेत. अर्थात तीनशे लोकांचे देखील आम्हाला दुःख आहे. पण सरकारला फार मोठा धक्का बसला किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही. अहमदाबाद एअरपोर्ट हे केंद्रबिंदू आहे. तिथे सहज कसा कोणाला प्रवेश मिळू शकतो? अहमदाबादच का निवडलं किंवा अहमदाबादला असा अपघात का झाला? असे खूप प्रश्न लोकांच्या मनात आहेत" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.