Palghar Mob Lynching: उद्धवजी मुझे पता है... अमित शहांनीही पालघर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना 'तेच' सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 15:22 IST2020-04-20T15:11:17+5:302020-04-20T15:22:29+5:30
रविवारी दुपारनंतर सगळीकडे पालघरची बातमी व्हायरल झाली. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मॉब लिचिंग प्रकार अन्य राज्यात अथवा गेल्या ५ वर्षात राज्यातही घडले आहेत

Palghar Mob Lynching: उद्धवजी मुझे पता है... अमित शहांनीही पालघर घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना 'तेच' सांगितलं
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती दिल्यानंतर पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेबद्दल ठाकरे यांनी माहिती दिली. तसेच, काही जणांकडून जाणीवपूर्वक आग लावण्यात येत असून या प्रकरणाला धार्मिक रंग दिला जात आहे. मात्र, या घटनेचा धार्मिकतेशी काहीही संबंध नसल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच, यांसदर्भात मी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही संवाद साधला आहे. अमित शहांनाही घटनेची संपूर्ण माहिती असून मीही सागितंलय, असेही ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात म्हटले.
रविवारी दुपारनंतर सगळीकडे पालघरची बातमी व्हायरल झाली. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मॉब लिचिंग प्रकार अन्य राज्यात अथवा गेल्या ५ वर्षात राज्यातही घडले आहेत. हे घडायला नको ही आपली संस्कृती नाही. मला राजकारण करायचं नाही. पण ही घटना पालघरच्या ११० किमी अंतरावर म्हणजे केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीनजीक घडलं. पालघरमध्ये ज्या गावात ही घटना घडली हा दुर्गम भाग आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. या परिसरात धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण होईल, असं काहीही नाही. मी स्वत: अमित शहांशी बोललोय, त्यांनीही मला आश्वस्त केलं. उद्धवजी मुझे पता... त्या भागात धार्मिक संदर्भ असण्याचं कारण नाही, तरीही काळजी घ्या, असे अमित शहांनीही मला सांगितल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही बोलणे झाले आहे. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे असे आपण त्यांना सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबितही केले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊन असतानाही गुजरातकडे निघालेल्या या साधुंना दादरा-नगर हवेली सीमेवर अडवण्यात आलं. तेथून पुन्हा मागे पाठवण्यात आलं. दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेश असताना त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यापेक्षा त्यांना रात्रभर ताब्यात घेऊन महाराष्ट्र सरकारशी बोलून त्यांना ताब्यात द्यायला हवं होतं. पण तसं झालं नाही. गेल्या काही दिवसांपासून या भागात चोराची अफवा पसरली आहे. गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांसमोर ही घटना घडली आहे, यातील २ पोलिसांना निलंबितही केलं आहे. तर १०० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यानन, या घटनेतील कोणत्याही दोषींना सोडणार नाही. सीआयडी गुन्हे शाखेचे डीआयडी अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात पुढील तपास होईल. या घटनेतील जबाबदार सगळेच तुरुंगात आहेत. जे फरार आहेत त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. हिंदू-मुस्लीम नजरेने या घटनेकडे पाहू नका असं आवाहन ठाकरे यांनी केलंय. तसेच, आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.