Join us  

... अन्यथा लोकांचा 'ठाकरे' नावावरील विश्वास उडेल, मनसेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 8:46 AM

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राता कहर केला असून वरुणराजा आता बास रे... अशी म्हणण्याची वेळ बळाराजावर आलीय. शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असले तरी, आता मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचं मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे

मुंबई : परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात दाणादाण उडाली. बुधवारी झालेल्या ढगफुटीने अनेक नद्यांना पूर आला. पुणे जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने चौघे मरण पावले. सोलापुरात १४ जणांचा बळी गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचं चित्र असून अनेक भागांत शेतीही पाण्याखाली गेली आहे. सोशल मीडियातून शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ शेअर करत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. 

परतीच्या पावसाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राता कहर केला असून वरुणराजा आता बास रे... अशी म्हणण्याची वेळ बळाराजावर आलीय. शेतात कापणीला आलेली उभी पीकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठं नुकसान झालंय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. प्राथमिक अंदाजानुसार २३ जिल्ह्यांमधील काढणीवर आलेल्या साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या तैन्यात केल्या आहेत. वायूसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनुष्यहानी टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असले तरी, आता मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्याची गरज असल्याचं मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं आहे. बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने या शेतकऱ्यांच्या पिकांची वाट लावली असून शेतात मातीऐवजी पाणीच पाणी दिसत आहे. या शेतकऱ्याचा आक्रोश पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. 

''मुख्यमंत्रीजी, घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल, अशी फेसबुक पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिलाय. 

अतिवृष्टीचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीचा तडाखा बसला. बुधवारी झालेल्या पावसाने भीमा व कृष्णा नदीला पूर आल्याने पंढरपूर व सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ पथकांची मदत घेण्यात आली. राज्यातील लाखो हेक्टरवरील सोयाबीन व भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तूर, भात या पिकांनाही अविृष्टीचा तडाखा बसला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक ठिकाणची वाहतूकही बंद करण्यात आली होती. पाऊस अजून सुरूच असून हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आणखी चार दिवस असाच कोसळण्याची शक्यता आहे.

भातपिकाचे नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातपिकाची अक्षरश: नासधूस केली आहे. ५५ हजार हेक्टर पैकी तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्राखालील भात पिकाची नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्गसह रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जाहीर केले आहे. तर बुधवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरात पुराचे पाणी शिरले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रशेतकरीउद्धव ठाकरेमनसे