Join us  

'त्या' केवळ अफवा! विमानतळ मुख्यालय अहमदाबादला नेण्याच्या चर्चेवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 7:48 PM

विमानतळ मुख्यालयाच्या स्थलांतरावरून वातावरण तापल्यानंतर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतल्याचं वृत्त समोर आल्यानं राजकीय वातावरण तापलं. मात्र आता अदानी समूहानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यालय हलवण्याबद्दलचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत तशा चर्चा निव्वळ अफवा असल्याचं अदानी समूहानं म्हटलं आहे. 

'मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला नेणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची मुख्यालयं मुंबईतच राहतील. मुंबईच्या अभिमानात भर घालत राहू हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू,' असं अदानी समूहानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अदानी समूहानं विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. तुम्ही गरबा कराल, तर आम्हाला झिंगाट  दाखवावा लागला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदानी समूहाला इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनं थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटलं. तसंच, अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इंस्टीट्यूट गुजरातला नेले जात आहेत. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारला इशारा दिला. 

टॅग्स :अदानीविमानतळकाँग्रेसमनसेनाना पटोले