Join us

... म्हणून कोकणातील एकाही शेतकऱ्याला 'कर्जमाफी' नाही, नितेश राणेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 08:01 IST

महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खातेदारांची माहिती

मुंबई - महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

महाविकास आघाडीने दिलेल्या कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार, 15 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर, ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या.., असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली. मात्र, नितेश राणेंनी या कर्जमाफीचा कोकणवासियांना काहीच फायदा नसल्याचे म्हटले आहे. 

''कर्जाच्या यादीत कोकणातल्या एकही शेतकऱ्याला कर्जमाफी नाही. कारण, कोकणात आपले कर्जे 100% भरतात. एनपीए होतच नाहीत. मग, कर्ज भरणाऱ्यांना आणि न भरणाऱ्यांना एकच न्याय. यापुढे कोकणच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरूच नये. तसेही माफ होणारच आहे, असे म्हणत कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांचं काय? असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :सिंधुदुर्गनीतेश राणे शेतकरीउद्धव ठाकरे