रेल्वे अर्थसंकल्पावर मुंबईकर नाराज

By Admin | Updated: February 27, 2015 01:42 IST2015-02-27T01:42:30+5:302015-02-27T01:42:30+5:30

एमयूटीपी-३ प्रकल्पांतर्गत मुंबई आणि मुंबईलगत पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात काही तरतुदी स्वागतार्ह आहेत

Mumbaikar angry on railway budget | रेल्वे अर्थसंकल्पावर मुंबईकर नाराज

रेल्वे अर्थसंकल्पावर मुंबईकर नाराज

एमयूटीपी-३ प्रकल्पांतर्गत मुंबई आणि मुंबईलगत पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात काही तरतुदी स्वागतार्ह आहेत. तथापि, दररोज ७० लाख प्रवासी ज्या लोकलमधून प्रवास करतात, त्यांचा प्रवास सुखकर होईल, अशी कोणतीही चिन्हे या अर्थसंकल्पातून समोर आलेली नाहीत. त्यामुळे अत्यंत कष्टात प्रवास करताना हतबल झालेल्या मुंबईकरांनी रेल्वे अर्थसंकल्पाबाबत ‘लोकमत’कडे नाराजी व्यक्त केली. त्यातीलच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया...

स्वच्छतेची काळजी घ्या
या वर्षीचा रेल्वे अर्थसंकल्प संमिश्र आहे. महिला सुरक्षाविषयी पुरेसा विचार केला आहे. एसी लोकलची घोषणा केली आहे. पण लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. रेल्वे फलाटावरील शौचालयाची योग्य रीतीने साफसफाई झाली पाहिजे. तसेच रेल्वेत गाड्यांच्या संख्येत वाढ अपेक्षित होती, त्यात निराशाच हाती आली.
- उमा देसाई, व्यावसायिक

मुंबईला होती नव्या गाड्यांची आशा
मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर नव्या गाड्यांची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. मुंबईकरांचा लोकल प्रवास वातानुकूलित होणार ही एक चांगली गोष्ट आहे. पण तो प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असावा. गर्भवती महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ हे अर्थसंकल्पातील विशेष आहे. रेल्वेच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही आणि रेल्वे अधिकाधिक रोजगार निर्मितीला चालना देणार आहे, हे उत्तम आहे. कारण यानिमित्ताने का होईना, शिक्षित आणि पात्र बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. - दीप्ती पन्हाळेकर, शिक्षिका

रोजच्या प्रवासात दिलासा नाहीच
रेल्वे अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी निराशाच आली आहे. नव्या रेल्वे मार्गांची अपेक्षा होती. पण तशी घोषणा झाली नाही. तसेच वातानुकूलित रेल्वे सर्वसामान्यांना फायदा देणारी नाही. रोजचा प्रवास सुखकर होईल, असे या अर्थसंकल्पात जाणवण्यासारखे काहीही नाही.
- गजेंद्र देवडा, शिक्षक

Web Title: Mumbaikar angry on railway budget