अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST2021-01-13T04:13:22+5:302021-01-13T04:13:22+5:30

मुंबई : राज्यात कोरोना बळींचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू हे अतिजोखमीच्या आजारांमुळे झाले असल्याची ...

Most deaths in the state due to high risk diseases | अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू

अतिजोखमीच्या आजारांमुळे राज्यात सर्वाधिक मृत्यू

मुंबई : राज्यात कोरोना बळींचा आकडा ५० हजारांच्या वर गेला आहे. त्यात सर्वाधिक मृत्यू हे अतिजोखमीच्या आजारांमुळे झाले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक बळी उच्च रक्तदाबामुळे झाले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अतिजोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींनी खबरदारी बाळगण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील दहापैकी सात रुग्णांचे मृत्यू कोरोनासह अन्य आजार असल्यामुळे झाले आहेत. कोरोनामुळे ओढावलेल्या मृत्यूंमध्ये ४६.७ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब, तर ३९.४ टक्के रुग्णांना मधुमेहाची लागण झाली आहे. त्यामुळे या दोन्ही आजारांचे सर्वाधिक प्रमाण असून लसीकरणाच्या प्रक्रियेतही आता अतिजोखमीच्या आजार असणाऱ्या गटांना प्राधान्य दिले जाणार आहे.

राज्यात आतापर्यंत ५० हजार २७ मृत्यूंची नोंद झाली आहे, यापैकी सर्वाधिक मृत्यू हे ६०-७० वयोगटातील आहेत. प्रत्येक पाचव्या मृत्यूमागे उच्च रक्तदाब आणि मधुमेह ही कारणे आहेत. देशात अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक प्रमाण पुरुषांचे आहे, पुरुष रुग्णांच्या मृत्यूचे ६९.८ टक्के प्रमाण असून ही संख्या ३४ हजार ९९९ मृत्यू झाले आहेत. दर ३०.२ टक्के महिलांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील दोन महिन्यात कोरोना मृत्युदरांत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title: Most deaths in the state due to high risk diseases