मुंबई - शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर, स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. आता, उद्यापासून नव्याने मैदानात उतरणार असून लोकांमध्ये जाणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच, अजित पवारांच्या शपथविधीला आमचा पाठिंबा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, या घडामोडींवरुन आता आरोप-प्रत्यारोप आणि प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली. तर, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनेही भाजपा व अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी या बंडावर प्रतिक्रिया देताना, पुढील काही दिवसांत राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशा शब्दात भूमिका मांडली. तर, अब तेरा क्या होगा दाढीया, म्हणत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या सत्तानाट्यावर प्रतिक्रिया देताना भाजपला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दोन दिवसांपूर्वीच्या भाषणाची आठवण करुन दिलीय.
दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. सहकारी बँकेचा उल्लेख केला होता. सिंचन घोटाळ्यांचा उल्लेख केला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या घोटाळ्याचाही मोदींनी उल्लेख केला होता. या दोन्ही घोटाळ्याचे जे सुत्रधार होते त्यांनाच भाजपने आज आपल्याजवळ घेतलंय. त्यांना मंत्रीपद देऊन धुवून स्वच्छ केलंय, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
मी मनी लाँड्रींग ऐकलं होतं, पण ही मिनिस्टर लाँड्रींग आहे, महाराष्ट्राची जनता ह्याला कधीही माफ करणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
काय म्हणाले अजित पवार
आदित्य ठाकरे यांनी दिवसभरातील घडामोडीनंतर सायंकाळी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. "आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न - मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं?? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो... जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते, आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी??" असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.