Join us  

'आमच्या प्रज्ञास्थळावर, महाराष्ट्रधर्मावर हल्ला'; राजगृहावरील हल्ल्याचा मनसेकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 2:10 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे.

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. मनसेने देखील या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे. 

मनसेने ट्विट करत म्हटले की, हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला, हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला आहे. त्यामुळे ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं, असं मनसेनं सांगितले आहे.

तत्पूर्वी,  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करण्याची गंभीर दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली आहे. या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजिना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे  स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसेडॉ. बाबासाहेब आंबेडकरउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारपोलिस