Sanjay Raut News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतची चर्चा आता जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते एकमेकांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू झाले असून, नेत्यांचे मनोमिलन कधी होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार? यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत. त्याचाच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असेल. त्यात चिंता करण्यासारखे काय आहे, उलट या गोष्टीचे स्वागत करायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का?
पहिला फोन किंवा पहिला संवाद कोण करणार हा मुद्दा आहे. दोन्ही भावांचा नंबर एकमेकांकडे आहे. आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करावा, त्यामुळे मुद्दा इगोचा राहिला आहे का, अशा आशयाचा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. यावर बोलताना, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपसून हे भाऊ आहेत ना. मी दोघांनाही पाहिले आहे. १० मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा १० मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो, असा सोशल मीडियावर मेसेज टाकून दोन्ही बंधू एकमेकांना फोन करणार नाही. काय सांगावे, फोन झालेही असतील, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. तुम्हाला फळ दिसल्याशी मतलब आहे ना. प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांनी तुम्ही म्हणाल की, झाडाला खूपच फळे आली आहेत, इतक्या गोष्टी पुढे गेलेल्या दिसतील, असा सूतोवाच संजय राऊतांनी केला.
अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो
पुस्तक पाठवले जाऊ शकते, तर संजय राऊत स्वतः शिवतीर्थ कॅफेटेरियावर प्रस्ताव घेऊन का येत नाही, अशा आशयाची विचारणा अमित ठाकरेंनी केल्याचे पत्रकारांनी विचारले. यावर, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून ओळखतो. जसे आदित्य ठाकरे आहेत, तसेच ते आहेत. त्यांची विधानेही गोड आहेत. अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. अमित ठाकरे यांची अलीकडील विधाने चांगली आहेत. आदित्य ठाकरेंची भूमिकाही चांगली आहे. अजून मनोमिलन काय हवे आहे. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही, आमच्यासाठी ते दुसरे घर आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांचा विषय आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्राचे शत्रू नाहीत. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या पाठीवर घाव घातले. तसे घाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी घातलेले दिसले नाहीत. हे राज ठाकरेही मान्य करतील. त्यामुळे भविष्यात या मुद्द्यावर एका टेबलावर चर्चा होऊ शकते. दोन भावांमध्ये प्रस्तावाची गरज नसते, असेही संजय राऊत म्हणाले.