Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 13:08 IST2019-10-11T12:35:14+5:302019-10-11T13:08:53+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : गुरुवारी रात्री मुंबईत दोन घणाघाती सभा घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Maharashtra Election 2019 : राज ठाकरे जाहीर भाषणात शिवी देणारच होते, इतक्यात...
मुंबई - गुरुवारी रात्री मुंबईत दोन घणाघाती सभा घेऊन मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीकास्र सोडले. तसेच गोरेगाव येथे झालेल्या सभेत भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही टीकेचे लक्ष्य केले. आरेमधील वृक्षतोडीबाबत शिवसेनेने घेतलेल्या दुटप्पी भूमिकेवर राज ठाकरे यांनी हल्ला चढवला. यावेळी आरेबाबत शिवसेना मुंबईकरांना वेड्यात काढत असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी ओठावर आलेली शिवी तोंडातल्या तोंडात रोखली. मात्र शिवीच्या पहिल्या अक्षरावरून नेमका बोध झाल्याने उपस्थितांनी राज ठाकरे यांना जोरदार दाद दिली.
मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्ता मिळाल्यावर आरेला जंगल घोषित करू अशी घोषणा केली होती. दरम्यान, याच वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली. ''रामदास कदम हे शिवसेनेचे नेते सध्या पर्यावरण मंत्री आहेत. मात्र ही वृक्षतोड त्यांना थांबवता आली नाही. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख सत्ता आल्यावर आरेला जंगल घोषित करू म्हणताहेत. आम्हाला काय च्यु...'' असं म्हणत राज ठाकरे यांनी आपले वाक्य तोडले. त्यानंतर आम्हाला काय मुर्ख समजता का, असा सवाल त्यांनी केला.
युतीच्या जागावाटपात पडती भूमिका घेण्यावरूनही राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. भाजपासोबतच्या युतीत 25 वर्षे सडली म्हणणारी शिवसेना युतीमधील जागावाटपात 124 जागांवर का अडली, असा बोचरा सवाल विचारत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना जाब विचारणा-या, नागरिकांचे प्रश्न सोडवणा-या व समस्यांवर आवाज उठवणा-या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथे पहिल्या जाहीर सभेत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कधी उमेदवार आयात करण्याची वेळ आली नव्हती, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला.