घड्याळाचे काटे बसलेत रुतून, त्याला किल्ली कोणी देईना; भाजपाकडून राष्ट्रवादीवर काव्यात्मक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 12:22 IST2019-10-13T12:19:50+5:302019-10-13T12:22:19+5:30

कायद्याचं राज्य येईल, पण मी म्हणालो कायद्याच्या राज्यात काय द्याचं हेच चालणार आहे, जे जे दिसतं, जे जे कळतं खुल्ला बोलतो

Maharashtra Election 2019: BJP poetic criticism of NCP in election Campaign | घड्याळाचे काटे बसलेत रुतून, त्याला किल्ली कोणी देईना; भाजपाकडून राष्ट्रवादीवर काव्यात्मक टीका

घड्याळाचे काटे बसलेत रुतून, त्याला किल्ली कोणी देईना; भाजपाकडून राष्ट्रवादीवर काव्यात्मक टीका

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागलेला असताना भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा प्रचारासाठी भन्नाट आयडिया शोधून आणली आहे. रम्याचे डोस या काल्पनिक चित्रांच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करणारा रम्या आता कवितेच्या माध्यमातून विरोधकांची खिल्ली उडवित आहे. रम्याचे डोसच्या माध्यमातून भाजपाने राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. 

या कवितेतं म्हटलं आहे की, कुणी म्हणालं घड्याळाला मत दे, कायद्याचं राज्य येईल, पण मी म्हणालो कायद्याच्या राज्यात काय द्याचं हेच चालणार आहे, जे जे दिसतं, जे जे कळतं खुल्ला बोलतो, घाबरत नाय, आता हाय ते हाय, घाबरत नाय, फाटक्यात पाय असे कवितेचे शब्द आहेत. 

इतकचं नाही तर सरकारने कलम 370 हटवलं तसं पूर्वोत्तर राज्यांमधून 371 कलम देखील हटवावं म्हणजे तिथे कोणत्याही भारतीयाला जमीन खरेदी करता येईल असं पवार म्हणाले होते. त्यावर डायरेक्ट साहेबांनी मुद्द्यालाच हात घातलात, त्यांच्या घड्याळात सात बारा वर काटे आले की, कसा गजरच व्हायला लागतो आणि घड्याळ नुसतं थुईथुई नाचू लागतं बघं असं सांगत रम्याचे डोस माध्यमातून राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपाचा सामना पाहायला मिळत आहे. भाजपा सरकारने केलेली विकासकामे विरोधकांच्या ५० वर्षे राजवटीपेक्षाही सरस आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. त्यांच्यापेक्षा तीन पट कामे देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखविली. तुम्ही फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलत राहिलात, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांना प्रचारसभेत लगावला होता. 

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिकडे जातील तिकडे ३७०-३७० असे करीत आहेत. काश्मीरमधील ३७० रद्द केले, त्याचा आम्हाला आनंद आहे व आमचा पाठिंबाही आहे. पण कोण चाललंय जमीन घ्याला काश्मीरला. दिवस-रात्र अमित शहा ३७०-३७० म्हणत आहेत़ रात्री झोपेतही ३७० म्हणत असतील, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांना यांच्यावर केली़ होती.     
 

Web Title: Maharashtra Election 2019: BJP poetic criticism of NCP in election Campaign