मुंबईत मेपासून लोकल, मेट्रो, बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावर - मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 07:44 IST2025-04-24T07:43:43+5:302025-04-24T07:44:39+5:30
१५ जूनच्या आत ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये पुरविली जाणार आहे.

मुंबईत मेपासून लोकल, मेट्रो, बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावर - मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - एकाच तिकिटावर लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्टने फिरता येईल, अशी सुविधा १ ते १५ मे दरम्यान मुंबईत सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ही घोषणा केली.
ते म्हणाले की १५ जूनच्या आत ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये पुरविली जाणार आहे. मुंबईतील या सुविधेसाठीची ट्रायल सध्या सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
नवीन समीकरणांची शक्यता कमी
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का, राज्यात काही नवीन समीकरणे उदयास येत आहेत असे वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले की, आतातरी मला तसे काही वाटत नाही, पण जे साद-प्रतिसाद देत आहेत ते याबाबत अधिक चांगले सांगू शकतील.
शेतकऱ्यांना कर्जमाफीे योग्यवेळी
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आमचे आश्वासन कायम आहे आणि योग्यवेळी ती दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चांगला पाऊस असेल त्या वर्षात अशी कर्जमाफी दिली तर बँकांनाच त्याचा फायदा होतो, तो शेतकऱ्यांना होत नाही. दर पाच वर्षांत एक वर्ष दुष्काळी असते, असा आजवरचा अनुभव आहे. अशावेळी आपण आज दुष्काळी वर्ष नसताना कर्जमाफी दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. तरीही आपण ती दिली तर प्रत्यक्ष दुष्काळी स्थिती राहील तेव्हा कर्जमाफी देण्याची राज्याची आर्थिक स्थिती राहणार नाही, असे मत फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. आम्ही कर्जमाफी करणारच आहोत पण त्यासाठीची योग्यवेळ असेल तेव्हा ती करणे शेतकरी हिताचे असेल, असे ते म्हणाले.