लोकलने प्रवास केल्यास होणार कायदेशीर कारवाई, मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2020 13:12 IST2020-09-20T13:11:59+5:302020-09-20T13:12:29+5:30
मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच आंदोलनाची हाक देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.

लोकलने प्रवास केल्यास होणार कायदेशीर कारवाई, मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांची नोटिस
मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर बंद करण्यात आलेली मुंबईतील उपनगरीय लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकलेली नाही. लोकलसेवा बंद असल्याने कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या पार्श्वभूमीवर कामावर जाणाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या अन्यथा सोमवार २१ सप्टेंबर रोजी सविनय कायदेभंग आंदोलन करत लोकल प्रवास करू, असा इशारा मनसेने दिला आहे. मात्र मनसेच्या आंदोलनाला काही तास उरले असतानाच पोलिसांनी मनसे नेत्यांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच आंदोलनाची हाक देणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी नोटिस बजावली आहे.
लोकल प्रवासास असलेल्या बंदीचा नियम मोडून लोकलने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी संदीप देशपांडे यांना दिला आहे. दरम्यान, मनसे आमदार राजू पाटील यांनीही कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सर्वसामन्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.
रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल pic.twitter.com/B0R09IjW22
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 17, 2020
आंदोलनाबाबत काय म्हणाले होते संदीप देशपांडे
'रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल' असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता. देशपांडे यांनी 17 सप्टेंबर रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले होते. तसेच 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही सरकारला केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळत होते..
देशात कोरोनाचा धोका वाढत असताना महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ही मार्च महिन्यापासून बंद आहे.