राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच्या विधानावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 10:40 IST2026-01-25T10:40:24+5:302026-01-25T10:40:56+5:30
Raj Thackeray News: बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का, अशी प्रतिक्रिया शनिवारी दिल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच्या विधानावरून वाद
मुंबई - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने मुंबईत बिहार भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धवसेना व मनसेने यावर आक्रमक भूमिका घेत त्यास विरोध केला आहे. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का, अशी प्रतिक्रिया शनिवारी दिल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उपचारांसाठी जाणाऱ्या बिहारच्या नागरिकांच्या सोयीसाठी हे भवन बांधले जात आहे. ते अन्य राज्यांतही बांधण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय अजेंडाचा भाग म्हणून नाही तर मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून ते बांधले जात आहे. त्यामुळे मुंबईत कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधले जाईल. त्याचे काम थांबवण्याची ताकद कुणातही नाही. या देशात कुणाचीही जबरदस्ती चालणार नाही, असे मंत्री चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
कोण काय म्हणाले?
अविनाश अभ्यंकर, मनसे: "आधी स्वतःच्या राज्यात रोजगार निर्माण करा. लोक महाराष्ट्रात का येतात, याचा विचार करा."
विनायक राऊत, उद्धवसेना: "मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्या हे लोक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुजरात भवनही बांधतील."
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस: "हा सांस्कृतिक उपक्रम असता तर पाटण्यामध्ये महाराष्ट्र भवनाचाही विचार झाला असता. या निर्णयामागे राजकीय हेतू आहे."
संजय निरुपम, शिंदेसेना: "राजकारण करून बिहार भवनाला विरोध करणे चुकीचे आहे. कर्करोग रुग्ण व त्यांच्या नातेवाकांसाठी ही इमारत बांधली जात आहे."
नवनाथ बन, भाजप: "बिहार भवनाला विरोध करण्यापेक्षा मनसेने आधी स्वतःचे भवन उभारावे."