मुंबई: राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं आहे. तसेच केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकाने देखील आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे देशभरात आर्थिक संकट निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. तसेच देशातील इतर राज्य सरकारनेही आपल्या राज्यासाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने अजूनही कोणत्याच पॅकेजची घोषणा केलेली नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
शरद पवार यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विविध मागणी करत आहे. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून बाराबलुतेदार आणि शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना लगावला आहे. तसेच राज्य सरकारकडून उपाययोजना नाही, केवळ राजकारण सुरू आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे.
दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊनची चौथ्या टप्प्यातील अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा वेगाने वाढत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्यावर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला.