Join us  

कुठे निर्बंध कायम अन् कुठल्या जिल्ह्यांमध्ये थोडी सवलत; १ जूनपासून 'ब्रेक द चेन'ची नवी नियमावली... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 8:36 PM

राज्यातील जिल्ह्यांची परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्या जिल्ह्यांत निर्बंध कडक करावे आणि कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिल करायचे, याबाबत स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या निर्बंधांबाबत निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं होतं.

मुंबई: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढता दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच राज्यातील जिल्ह्यांची परिस्थितीचा आढावा घेऊन कोणत्या जिल्ह्यांत निर्बंध कडक करावे आणि कोणत्या जिल्ह्यात लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिल करायचे, याबाबत स्थानिक प्रशासन लॉकडाऊनच्या निर्बंधांबाबत निर्णय घेईल, असं स्पष्ट केलं होतं. या संदर्भातील अधिकृत आदेश काही जिल्ह्यांनी आज जारी केला आहे. 

मुंबई-

मुंबईत १ जूनपासून लॉकडाऊनच्या नियमात काही सवलती देण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकांनाची वेळ वाढवण्यात आली आहे. मुंबईतील दुकानं आता दुपारी २ वाजेपर्यंत खुली राहणार आहे. 

पुणे

पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून पुणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न होताय. पुण्यातील लॉकडाऊनमध्ये उद्यापासून मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात येतेय. उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पुण्यातील सर्व दुकाने सुरु राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयेही २५ टक्के उपस्थितीत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

 ठाणे-

ठाणे  महापालिकेने मंगळवार पासून कोरोना बाबतीतील नियम शिथील करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा ८ ठिकाणी लॉकडाऊनचे नियम कडक असतील असे जाहीर केले आहे. याठिकाणी पुढील १५ जून र्पयत कडक लॉकडाऊन असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. यामध्ये लोकमान्य नगर - सावरकरनगर प्रभाग समितीमधील काही भाग, कळवा आणि उथळसर आणि वागळेतील काही भागांचा समावेश किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक र्निबध असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सातारा-

साताऱ्यात लॉकडाऊनमध्ये ८ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. किराणा दुकाने, बेकरी, मटण, चिकन शॉप, हॉटेल राहणार बंद. फक्त अत्यावश्यक सेवेतील बाबी राहणार सुरू राहणार आहे. तर पेट्रोल पंपावर देखील अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल आता मिळणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढला आहे.

नागपूर- 

पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये नागपूरमध्ये पुढील 15 दिवसांचे नियोजन करण्याचे घोषित करण्यात आले. यामध्ये नागपूरमधील पुढील पंधरा दिवसाचे नियोजनही शासनाच्या नियमाप्रमाणेच राहील. यामध्ये प्रामुख्याने सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू असतील, यापूर्वी ही दुकाने ७ ते ११ या काळात सुरु होती. मात्र मॉल बंद असेल.

रत्नागिरी-

ब्रेक द चेन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात २ ते ८ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्यासह जिल्हाप्रवेश बंदी करण्याचे निर्देश जारी.

लातूर-

रुग्णसंख्या घटल्यामुळे जिल्ह्यात निर्बंध शिथील करण्यात आले असून, जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आठवड्यातील पाच दिवस उघडे ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बीअर बार यांना फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी सेवा देता येणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सदर माहिती दिली असून, ते म्हणाले, आपल्या जिल्ह्य)चा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकानांना दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पिंपरी चिंचवड-

  • १ जून ते १० जूनसाठी नवी नियमावली 
  • अत्यावश्यक दुकानांशिवाय इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू.
  • सर्व बँका खुल्या असणार.
  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा.
  • मद्यविक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ खुली राहणार .
  • ई कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची घरपोच सेवा करण्याची मुभा.
  • दुपारी ३ नंतर अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.

नंदुरबार-

  • सर्वच व्यापारी आस्थापना दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार
  •  कृषी संदर्भातील आस्थापना ६ वाजेपर्यंत सुरू राहणार 
  • रात्रीची संचारबंदी कायम 

वाशिम-

  • सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहणार
  • अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी, रविवारी बंद
  • हॉटेल, रेस्टॉरंट, मद्य विक्री खानावळीमध्ये केवळ घरपोच पार्सल सेवेस मुभा
  • पेट्रोल डिझेल सेवा २ वाजेपर्यंत सुरू 
  • अत्यावश्यक सेवा कृषी  सेवा वाहन २४ तास सुरू 

सांगली-

  • अत्यावश्यक सेवेमधील सर्व किराणा दुकाने, फळं आणि दूध, बेकरी ,खाद्य आणि मटण दुकान ७ ते ११ सुरू राहणार
  • भाजी मंडई हे सकाळी ७ ते ११ सुरू राहतील मात्र आठवडा बाजार बंद राहतील.
  • २ जूनपासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी  ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी 

यवतमाळ-

  • अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जूनपासून  सकाळी ७ ते  दुपारी २ वाजेपर्यंत सुरू 
  • केवळ कृषिशी संबंधित दुकाने ३ वाजेपर्यंत सुरू 
  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद 

अकोला-

  • सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकानं, पेट्रोलपंप राहतील सुरू
  •  बँका १०  ते ३ या वेळेत सुरू राहणरा आहेत. 

परभणी- 

  • किराणा,भाजीपाला,फळ विक्रेत्यांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुभा
  • शनिवार व रविवार सर्व  बंद
  • शेती संबंधित निगडीत सर्व दुकाने, बाजार समिती, मोंढा, आडत बाजार यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ७ ते  संध्याकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
टॅग्स :उद्धव ठाकरेलॉकडाऊन अनलॉकमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबईपुणेमहाराष्ट्र सरकार