विद्यार्थी दुप्पट, शिक्षिका तेवढ्याच! जुन्या निकषानुसार शिक्षक संख्या असल्याने उद्भवली समस्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:58 IST2025-06-03T13:57:32+5:302025-06-03T13:58:31+5:30
बालवाडीतील बालकांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार?

विद्यार्थी दुप्पट, शिक्षिका तेवढ्याच! जुन्या निकषानुसार शिक्षक संख्या असल्याने उद्भवली समस्या
घनश्याम सोनार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महापालिकेच्या ९०० बालवाडीत विद्यार्थ्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत दुप्पट म्हणजे ३०,९६१ इतकी झाली आहे. मात्र बालवाडी शिक्षिका आणि मदतनीस संख्या दहा वर्षांपूर्वीच्या निकषानुसार १८०० इतकी असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. त्यामुळे एका वर्गात अधिक विद्यार्थी संख्या असल्याने त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर पालिकेने २००७ साली बालवाड्या सुरू केल्या आहेत. २०१५-१६ मध्ये ५०४ बालवाडीतील विद्यार्थी संख्या १३,२७७ होती. तेव्हा प्रत्येक बालवाडीला एक शिक्षिका व एक मदतनीस नियुक्त करण्यात आली होती. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ यावर्षी ९०० मंजूर बालवाड्या आहेत. त्यात एकूण नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३०,९६१ इतकी आहे. मात्र विद्यार्थी संख्येत वाढ झाल्यावरही बालवाडीत एक शिक्षिका आणि एक मदतनीस नियुक्त करण्यात आली आहे.
२०२३ साली मिळाली वाढ
शिक्षिकांना ८,००० रुपये तर मदतनीस यांना ५,०० रुपये मानधनात वाढ २०१९ मध्ये मंजूर करण्यात आली होती. मात्र ही वाढ २०२३ साली मिळाली.
शारीरिक विकासासह आरोग्यावर भर
नवीन शिक्षण धोरणानुसार बालवाडीत विद्यार्थ्यांना भाषा, साक्षरता कौशल्य, गणितीय संकल्पना यांची ओळख सामाजिक आणि भावनिक विकास, समूहात काम करण्याची क्षमता, त्यांचे शारीरिक शिक्षण, संगीत व खेळ, नृत्याद्वारे शारीरिक विकास व आरोग्य वैयक्तिक स्वच्छता यावर भर आहे. त्यामुळे पालिकेने स्वतः बालवाड्या चालवल्या पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य यांनी व्यक्त केले.
वर्ष बालवाड्या विद्यार्थी संख्या
- २०१५-१६ ५०४ १३,२७७
- २०१६-१७ ५०४ १२,५५९
- २०१७-१८ ५०४ १४,८५४
- २०१८-१९ ९०० २०,४१२
- २०१९-२० ९०० २६,५३३
- २०२०-२१ ९०० २०,६०७
- २०२१-२२ ९०० २७,७२६
- २०२२-२३ ९०० ३२,०५२
- २०२३-२४ ९०० ३३,०३२
- २०२४-२५ ९०० ३०,९६१
सर्व खर्च जर महापालिका करते, तर संस्थांकडे शिक्षणाची जबाबदारी सोपवण्याचे कारण नाही. पूर्वी एका वर्गात आधी २० बालके बसत होती, त्यांची संख्या वाढल्याने आता ४० बालकांना एका वर्गात बसविले जात आहे.
- रमेश मारुती जाधव, अध्यक्ष, श्रमिक भारतीय युनियन