Join us  

बोलुन नाही करून दाखवा, पॅकेज द्या; भाजपचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:42 PM

राजकारण करु नका हे नेमके कुणाला सांगताय? खा. संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, असा सवालही शेलार यांनी केला.

मुंबई : आधी कोरोनाला हरवणार मग मदतीचे पॅकेज देणार..! म्हणजे, मेल्यावर पाणी पाजायला येणार का? तुम्ही विरोधी पक्षात होतात त्यावेळी शेतकऱ्यांना पॅकेज द्या, अशा मागण्या करीत होतात ते काय होते? आता बोलून नाही, करुन दाखवा, असे आव्हान भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, अडचणीत आलेला शेतकरी, बारा बलुतेदार, महिला बचत गट, छोटा उद्योजक, विद्यार्थी, कामगार आणि मुंबईकर, करदाते यांना काही तरी मदत करावी असे मुख्यमंत्र्यांना वाटत नाही का? हॉस्पिटलमध्ये रुग्णांना घेतले जात नाही. रुग्णवाहिका, खाटा नाहीत. निष्पाप जीव जात आहेत. आपल्या जीव धोक्यात घालून काम करणाºया पोलिसांचे पगार कापले जात आहेत. त्यांना पगार तरी द्या.

राजकारण करु नका हे नेमके कुणाला सांगताय? खा. संजय राऊत आणि मंत्री जयंत पाटील यांना?, असा सवालही शेलार यांनी केला. महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना रुग्णांंची संख्या वाढते आहे. रुग्णालयात रुग्णांना जागा शिल्लक नाहीत, खासगी रुग्णालये दाद देत नाहीत, खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर नाहीत, नर्स, डॉक्टर नाहीत, रुग्णवाहिका मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारभाजपाउद्धव ठाकरेआशीष शेलार