Join us  

तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद? खातेवाटपावरून काँग्रेसचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 1:08 PM

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या शपथविधीला पंधरवडा उलटत आला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही

मुंबई  - महिनाभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य सहा मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. मात्र या शपथविधीला पंधरवडा उलटत आला तरी या मंत्र्यांचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. तसेच महत्त्वाच्या खात्यांबाबत एकमत होत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. दरम्यान, सरकारमधील तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्याच्या सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील खातेवाटपाबाबत अद्याप चर्चाच सुरू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीत खातेवाटपाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या तीन महत्ताच्या खात्यांवरन मतभेद निर्माण झालेले आहे. त्यातच या सरकारमध्ये महत्त्वाची खाती मिळत नसल्याचे दिसत असल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. खातेवाटपात समाधानकारक खाती  न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.  २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नितिन राऊत यांनी मंत्रिपदांची शपथ घेतली. मात्र अद्याप या मंत्र्यांना पदभार देण्यात आलेला नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास खाती स्वत:कडे ठेवली होती. त्याचप्रमाणे शिवसेनेनंदेखील ही खाती स्वत:कडे घेतली आहेत. फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेही दोन्ही महत्त्वाची खाती स्वत:कडेच ठेवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रिपद कोणाला देणार, बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांचं काय होणार, याकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसराजकारण