Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:19 IST2022-02-25T15:18:33+5:302022-02-25T15:19:59+5:30
Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकलेले असताना पंतप्रधान मोदी प्रचारात व्यक्त असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंचे PM मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी
मुंबई: रशिया–युक्रेन युद्ध पेटले (Russia-Ukraine Conflict) असताना भारतातील जवळपास २० हजार विद्यार्थी तेथे अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी आहेत. केंद्र सरकारने तातडीने या विद्यार्थ्यांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी तात्काळ यात लक्ष घालून विद्यार्थ्यांना मायदेशी आणावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून केली आहे.
नाना पटोले यांनी युक्रेनमध्ये अडकलेली मुंबईतील विद्यार्थीनी चैताली हिच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती घेतली. भारत सरकारने तातडीने हालचाल करुन युक्रेनमधून मायदेशी आणण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन चैतालीने केले आहे. युद्धाचे सावट असतानाच या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावयास हवे होते पण आपले परराष्ट्र मंत्रालय यात अपयशी ठरले आहे. युद्धाची शक्यता दिसताच काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र पाठवून या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती पण दुर्दैवाने केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा प्रचारात व्यस्त
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसह इतर राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना आज अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विमान प्रवासाचे भाडेही प्रचंड वाढवण्यात आले. युद्ध परिस्थीतीमुळे हवाई मार्गाने आणण्यात अडचणी येत असल्यास या विद्यार्थ्यांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करुन सुरक्षितस्थळी हलवावे व तेथून त्यांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा प्रचारात व्यस्त आहेत परंतु त्यातून थोडा वेळ काढून या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी त्यांनी तात्काळ हालचाली कराव्यात, असेही पटोले म्हणाले.