Join us  

जनसामान्यांचा कैवारी गेला; मान्यवरांनी वाहिले एकनाथ गायकवाड यांना शब्दपुष्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 6:49 AM

माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. त्यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केला होता.

मुंबई : माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. त्यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. या विजयाने  ‘जायंट किलर’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करीत दुसऱ्यांदा खासदारकी पटकाविली. त्यांच्या निधनाने जनसामान्यांचा कैवारी गेला, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांना शब्दपुष्प अर्पण केले. 

एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे समाजकारण-राजकारणातील दोन पिढ्यांचे मार्गदर्शक असे ज्येष्ठ नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या नेतृत्वाची पोकळी जाणवत राहील. धारावी आणि मुंबईतील जनमानसाशी जोडून घेऊन त्यांनी विधिमंडळात आणि संसदेतही उत्कृष्ट काम केले. त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मितभाषी असलेले एकनाथ गायकवाड नेहमी जनसामान्यांमध्ये राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उपेक्षित लोकांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचा कैवारी गेला.- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचे निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. - अजित पवार, उपमुख्यमंत्री

एकनाथ गायकवाड यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कन्या आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य कुटुंबीय यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

एकनाथ गायकवाड यांनी धारावीसारख्या भागात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला.                                                - बाळासाहेब पाटील, सहकार मंत्री

अत्यंत कठिण काळात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी एकनाथ गायकवाड यांनी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने काँग्रेसने सर्वांना सोबत नेणारे नेतृत्व गमावले आहे.- बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

काँग्रेस पक्षाचा एक प्रमुख चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. साधी राहणी व कार्यकर्त्यांशी संपर्क त्यांनी कधी सोडला नाही. - अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

एकनाथ गायकवाड यांनी समाजकारण करताना सर्वसामान्यांचे प्रश्न आपले समजून त्यांना वाचा फोडण्याचे कार्य केले.  - अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री

कार्यकुशल असलेले एकनाथ गायकवाड हे कुशल संघटकही होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसच नाही सामाजिक चळवळीचेही मोठे नुकसान झाले.- छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

खडतर परिस्थितीतून पुढे आलेल्या एकनाथ गायकवाड यांनी आमदार म्हणून मुंबईतील धारावी मतदार संघात उत्तम काम केले. - राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री

निष्ठावान, अनुभवी व लोकप्रिय नेतृत्व आज हरपले आहे. काँग्रेस पक्षाचे विशेषतः मुंबई काँग्रेसचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. - भाई जगताप, अध्यक्ष मुंबई काँग्रेस

टॅग्स :मृत्यूउद्धव ठाकरेअजित पवारमहाराष्ट्रकाँग्रेस