मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे, काँग्रेसचा गंभीर आरोप, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:38 IST2026-01-16T19:37:04+5:302026-01-16T19:38:52+5:30
BMC Elections Result 2026: काँग्रेसने भाजपा आणि महायुतीच्या विजयाबाबत शंका उपस्थित केली आहे. मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे मिळालेलं आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे, काँग्रेसचा गंभीर आरोप, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले...
राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगपालिका निवडणुकीची मतमोजणी संध्याकाळी सात वाजल्यानंतरही सुरू असून, अद्याप चित्र पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने आघाडी घेतली आहे. त्यावरून आता काँग्रेसनेभाजपा आणि महायुतीच्या विजयाबाबत शंका उपस्थित केली आहे. मुंबईतील भाजपाचे यश फिक्सिंगमुळे मिळालेलं आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईत भाजपाला मिळालेले यश हे फिक्सिंगचा भाग आहे. प्रभाग रचनेपासून पाडू नावाच्या मशिनपर्यंत व शाईचा घोळ हा सर्व फिक्सिंगचा खेळ होता. निवडणूक आयोगाने सावरासावर करणे बंद करावे तसेच भाजपाच्या इशाऱ्यावर चालणे बंद केले पाहिजे. भाजपाकडे कसलीही नैतिकता, लाज राहिलेली नाही. लोकशाही खरोखरच संकटात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, पाकिट वाटप, बोगस मतदार, उमेदवारांची पळवापळवी, व निवडणूक आयोगाचा गलथान कारभार हे सर्व पाहता फ्रि अँड फेअर निवडणुका होत नाहीत हे स्पष्ट दिसले. हुकमशाही वाढत वाढत जाते पण एका ठिकाणी त्याचा फुगा फटतो, आता हा फुगा फुटण्याचा क्षण जवळ आला आहे. कालच उत्तरायण सुरु झाले आहे पुढचा काळ भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांसाठी अडचणीचा राहणार आहे असा इशारा सपकाळ यांनी दिला.
“करुन घेतलं बोगस मतदान, वाटल्या नोटा, निवडणूक आयोगाच्या मदतीने कमळाबाई बांधते सत्तेचा फेटा”, अशा खोचक शब्दात भाजपाच्या विजयाचे वर्णन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.