महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:17 IST2026-01-11T14:16:50+5:302026-01-11T14:17:39+5:30
BJP-Shivsena Manifesto Mumbai BMC Election 2026: केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या महायुतीने मुंबईकरांना भरघोस आश्वासने दिली आहेत

महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
BJP-Shivsena Manifesto Mumbai BMC Election 2026: भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचा वचननामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. सुमारे १५ ते १६ पानी वचननाम्यात मुंबईकरांना विविध आश्वासने देण्यात आली आहेत. या आश्वासनांची पूर्तता २०२९पर्यंत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आणि आता मुंबई मेट्रो याबाबत जाहीरनाम्यात विशेष बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.
महायुतीचा पाताललोक... मुंबई मेट्रो
वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे, कोस्टल रोड (टप्पा १) यातून मरीन ड्राईव्ह ते वरळी दरम्यानचा प्रवास वेगवाग करण्यासाठी मुंबईतील पहिला समुद्री बोगदा कार्यान्वित झाला आहे. मुंबई मेट्रो लाईन ३ (Aqua Line)चा कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा टप्पाही सुरु झाला आहे. मुंबईतील पहिली पूर्णतः 'अंडरग्राउंड' मेट्रो संपूर्ण मार्ग प्रवाशांसाठी खुली आहे. त्यातच भर म्हणून ठाणे-बोरीवली अंडरग्राउंड टनेल करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात आहे. ज्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा हा बोगदा बोरीवली आणि ठाण्यातील अंतर अवघ्या १०-१५ मिनिटांवर आणेल. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) सुरु केला जाणार आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा महत्त्वाचा दुवा ठरेल, ज्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा हा पूर्व मुक्त मार्ग (Eastern Freeway) आणि कोस्टल रोडला जोडणारा भूमिगत मार्गही तयार केला जाईल, ज्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी पूर्णतः संपेल, असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.

मुंबई लोकल बाबत...
मुंबई लोकलसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेन आणि मेट्रोसाठी विशेष योजना हाती घेण्यात येणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित प्रयत्न करत आहे. मुंबईकरांचे प्रवासाचे तास कमी करणे आणि त्यांना सोयीचा प्रवास करण्याची संधी देणे याकडे महायुतीचे लक्ष आहे. त्यानुसार प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, ट्रेनचे डब्बे वाढवणे ट्रेनची सफाई चांगली करणे, स्टेशनवर एस्कलेटर्स लावणे, प्रवाशांसाठी अधिकच्या सोयी सुविधा पुरवणे या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. याच्या दुसऱ्या टप्प्यात लोकल ट्रेनच्या डब्यांची संख्या तीनने वाढवून लोकल १८ डब्ब्याची करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भातील ट्रायल्स घेतल्या जात आहेत. तसेच नवीन सिग्नल सिस्टीमच्या सुद्धा ट्रायल घेतल्या जात आहेत. सर्व लोकल ट्रेनना मेट्रोच्या डब्यांसारखे बंद दरवाज्याचे डबे आणि संपूर्णपणे एसी असलेले डबे देण्याची सुविधा करण्याचाही सरकारचा मानस आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी चर्चा झालेली असून सामान्य मुंबईकराच्या खिशावर ताण येणार नाही असे आश्वासन देण्यात आले आहे.