Join us  

''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 1:09 PM

तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता.

मुंबई: आम्हाला संविधानाच्या चौकटीतच सरकार चाललं पाहीजे. संविधानाच्या चौकटीबाहेर बाहेर जायचं नाही आणि तसं झालं तर सरकारमधून बाहेर पडायचं, अशी सूचना  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली होती असे काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील भाषणात सांगितले.

सोनिया गांधी यांनी दिलेल्या सूचना मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली. यावर उद्धव ठाकरे यांनी काही हरकत नाही आणि त्याच्याबाहेर जाणार नाही. घटना हीच शिवधार्य मानून, घटनेच्या चौकटीत राहून सरकार चालणार असं आश्वासन दिले असल्याचे देखील अशोक चव्हाण यांनी सांगतिले. अशोक चव्हाण यांच्या या विधानावरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, "तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. दिल्लीतल्या आमच्या नेत्यांना भेटलो. मात्र आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही. रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील. सरकार चालवणार कसं? असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला. यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली होती असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांनी सांगितलेली संपूर्ण माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या बाहेर जाणार नाहीत. घटना हीच शिरोधार्य मानून घटनेच्या चौकटीत सरकार चालणार, अशी भूमिका घेतली त्यामुळे हे सरकार स्थापन झालं असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावर खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे असं ट्विट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

आमचं क्षेत्र असो वा सिनेमा, नाट्य क्षेत्र सारखचं असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे. आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटत नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो, हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे, तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं आहे असं अशोक चव्हण यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेनिलेश राणे भाजपाशिवसेनामहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीसोनिया गांधीकाँग्रेसअशोक चव्हाण