'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:13 IST2020-01-02T14:07:00+5:302020-01-02T14:13:13+5:30

उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena's Rs 10 rupee plate plan | 'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

'अटी बघूनच भूक मरेल; शिवभोजन नाव बदलून 'अटीभोजन' करा'

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयात पोटभर जेवण ही योजना अंमलात आणली असून राज्यसरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. मात्र शिवभोजन थाळी दुपारी 12 ते 2 एवढ्याच कालावधीमध्ये उपलब्ध असणार असून थाळीच्या योजनेमध्ये विविध अटी घालण्यात आल्या आहेत. यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी थाळीच्या अटी बघून भूक मरेल अशी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

 निलशे राणे ट्विट करत शिवभोजन थाळीवर म्हणाले की, थाळीवर घालण्यात आलेल्या अटी बघूनच भूक मरेल. तसेच शिवभोजन नाव बदलून अटीभोजन करा असा टोला देखील निलेश राणेंनी शिवसेनेवर लगावला आहे. त्याचप्रकारे सरकारकडून सरळ हाताने काय मिळेल अशी अपेक्षा करु नका असं देखील निलशे राणे यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात केवळ 18000 थाळ्या दरदिवसाला वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे, 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 18,000 थाळ्या कशा पुरतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेत मुंबई शहर आणि उपनगरसाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला सर्वात कमी 150 थाळ्या देण्यात आल्या आहेत.

शिवभोजन योजनेत थाळ्यांसह त्यातील जेवणाच्या प्रमाणावर बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार, 2 चपाती, 1 वाटी भाजी, 1 वाटी डाळ आणि भात मिळणार आहे आणि ते ही दुपारी 12 ते 2 या दोन तासातच हे जेवण मिळेल. गोरगरीबांना 10 रुपयांत भोजन मिळण्याची व्यवस्था करणाऱ्या शिवभोजन योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. तसेच ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यासाठी तीन महिन्यांसाठी सुमारे 6 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद मंत्रिमंडळाकडून करण्यात आली. राज्यात सत्ता आल्यास भुकेल्यांना 10 रुपयांत भोजन देण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानुसार विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समारोपाच्या भाषणात इतर मोठ्या घोषणांप्रमाणेच 10 रुपयांत भोजन देण्याचीही घोषणा केली होती.

Web Title: BJP leader Nilesh Rane criticizes Shiv Sena's Rs 10 rupee plate plan