Join us  

'पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणे हे स्वाभाविक'; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 11:14 AM

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई: पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले आहे. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षाच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे.

भाजपाने या प्रकरणात विरोधी पक्षाची जी काही भूमिका आहे ती चोख बजावली आहे. मुंबई-महाराष्ट्रात महिला कशा सुरक्षित नाहीत असे तो आता ओरडून सांगत आहे. साकीनाक्याच्या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला असला तरी मुंबई हे महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर आहे, याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. अशा घटना एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते, असेही ते म्हणाले.

मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. विरोधी पक्षनेते सांगतात, त्याप्रमाणे त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईल. कोणत्या विषयाचे व प्रकरणाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे. साकीनाकाप्रकरणी डोळय़ांत अश्रू यावेत ही मनाची संवेदनशीलता आहे, पण नक्राश्रू ओघळू लागले की, भीती वाटते, प्रकरणाचे गांभीर्य नष्ट होते, असे शिवसेनेनं म्हटले आहे. शिवसेनेच्या या अग्रलेखावरुन आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कित्येक महिने मंत्रालयाची पायरी न चढणाऱ्या, कायम घरी बसणाऱ्याला नेत्याला बेस्ट मुख्यमंत्री ठरवणारे मुखपत्र, पाशवी बलात्काराच्या घटनेनंतरही पाठ थोपटून घेणे हे स्वाभाविक असं म्हणत निर्लज्जपणा दुसरे काय, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

दरम्यान, पोलिसांना त्यांचे काम करू द्या. तरीही साकीनाका प्रकरणाची फाईलही कुणाला 'ईडी' वगैरेकडे सोपवायची असेल तर त्यांना कोण रोखणार? काय वाट्टेल ते करू द्या !, असेही राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या प्रकरणाचं राजकारण होत असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला आहे. 

टॅग्स :अतुल भातखळकरसंजय राऊतभाजपामहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरे