Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू"; भाजपाने ठाकरेंना दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 08:49 IST

भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. राज आणि उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचारांबद्दल भाष्य केलं. "त्यावेळचं वातावरण वेगळं होतं. त्या वातावरणामध्ये बाळासाहेबांनी तो विचार जेव्हा देशामध्ये फुंकला. त्याच्यानंतर यश सर्वार्थाने यायला लागलं. आज जर बाळासाहेब असते, जो हिंदुत्वाचा सगळ्या ठिकाणी जो काही बाजार मांडून ठेवला आहे, तो पाहिला असता तर निश्चित व्यथित झाले असते" अशी खंत राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलताना व्यक्त केली. यावरून आता भाजपाने ठाकरेंना टोला लगावला आहे. 

"उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासाने त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या. हे कटू असलं तरी वास्तव आहे, आरसा कधी खोटं बोलत नाही…" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "...आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू" असं म्हणत त्यांनी राज आणि उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे. 

"आरसा कधी खोटं बोलत नाही… राजकारणात निष्ठा विकल्या जात आहेत म्हणून शिसारी येते असं राज ठाकरे म्हणतात. पण या आरशात त्यांनी आधी स्वतःला पाहायला हवं होतं आणि तोच आरसा उद्धव ठाकरे यांनाही दाखवायला हवा होता. या अधःपतनाची पहिली ठिणगी कोठे पडली ते तिथेच पाहायला मिळालं असतं…"

"उद्धव ठाकरेंच्या सत्तेच्या हव्यासाने सीमारेषाच पुसल्या"

"२०१९ पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात किमान काही बाकी होते. कोण कुठे उभा आहे हे स्पष्ट होतं. भाजपा–शिवसेना एका बाजूला आणि काँग्रेस–राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला. मतभेद होते, तरीही, काही सीमारेषा होत्या. पण उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या हव्यासाने त्या सीमारेषाच पुसल्या गेल्या. हिंदुत्वाशी फारकत घेत, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुंटीला टांगून, ज्यांच्याशी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्याच मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू झाली."

"आरसा कधी खोटं बोलत नाही…"

"हे कटू असलं तरी वास्तव आहे. जेव्हा विचारधारा सत्तेसाठी विकली जाते, तेव्हा उद्या निष्ठा विकल्या जातीलच. आज जे नगरसेवक फुटत असल्याचे जे तमाशे सुरू असल्याच दुःख राज ठाकरे यांना होत आहे, त्याची बीजं २०१९ मध्येच पेरली गेली होती. आरसा कधी खोटं बोलत नाही…" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच निष्ठेचं राजकारण, सत्तेसाठी सगळं काही, विचारधारा विक्रीला, शिसारी येते, राज_ठाकरे हे हॅशटॅग वापरले आहेत. 

टॅग्स :भाजपाहिंदुत्वउद्धव ठाकरेराज ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेनाराजकारणमनसे