कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:59 IST2024-05-23T13:59:12+5:302024-05-23T13:59:34+5:30
मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली होती, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले. तसेच मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा डाव सरकारने रचल्याचा आरोपही त्यांनी केला.

कमी मतदानामागे मोठे षडयंत्र; चौकशीची मागणी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रियेत मुंबईतमतदानाची टक्केवारी घटली. निवडणूक आयोगाचा अनागोंदीपणा व निष्काळजीपणा याला जबाबदार असून यामागे मोठे षडयंत्र आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी केली.
मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दोन बोटांवर निवडणूक अधिकाऱ्यांनी शाई लावली होती, याकडेही दानवे यांनी लक्ष वेधले. तसेच मर्जीतील अधिकारी बसविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची बदली करण्याचा डाव सरकारने रचल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही निवडणूक आयोगाला या मुद्द्यावरून लक्ष्य केले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदान कमी व्हावे यासाठी जाणून बुजून प्रयत्न केले, असा आरोप आव्हाड यांनी केला.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे महाविकास आघाडीची तक्रार
मतदान प्रक्रियेतील संथगती आणि मतदान केंद्रांवरील ढिसाळ कारभार यासारख्या मुद्द्यांवर उद्धवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली.