Join us  

Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 9:06 AM

Bharat Bandh : सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण...

मुंबई - इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. देशभरात ठिकठिकाणी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांकडून निदर्शनं सुरू करण्यात आली आहेत. या बंदला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे, सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.  विरोधकांनी पुकारलेल्या 'भारत बंद'ला शिवसेनेनं पाठिंबा का दर्शवला नाही,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. 

शिवसेनेचे बंदमध्ये सहभागी न होण्याचे हे आहे कारण

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोनमुळे शिवसेना बॅकफुटवर गेल्याची माहिती समोर आली आहे. विरोधकांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होऊ नका, अशी विनंती करणारा फोन अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपा नेत्यांनी विनंती केल्यानंतर शिवसेना बॅकफुटवर गेल्याचे म्हटले जात आहे.  

शिवाय, आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेनेच्या युतीमध्ये फूट पडू नये,यासाठीदेखील भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरूअसल्याचेही म्हटले जात आहे. 

 (Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे)

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपासहीत विरोधकांवर निशाणा साधला आहे.  ''भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार? आम्हाला महागाईत होरपळणार्‍या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत? जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

 

या पक्षांचा बंदला पाठिंबा

दरम्यान, भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

(दिल्लीश्वरांची कानठळी बसेल असा कडकडीत बंद पाळा - राज ठाकरे)

बंदला केवळ पाठिंबाच नव्हे; तर सक्रिय सहभाग राहणार असल्याचे सांगत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीश्वरांनी काय काय चुका करून ठेवल्यात, याचा हिशोब त्यांच्या कानठळी नीटपणे पोहोचेल इतका कडकडीत बंद पाळा, असे आवाहन करीत मोदी सरकार व भाजपावर प्रहार केला आहे. नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था संकटात आल्याने ती सावरण्यासाठी भरमसाट कर लादण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

टॅग्स :अमित शाहभारत बंदकाँग्रेसउद्धव ठाकरे