Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bachhu Kadu: असं नामर्दासारखं काय बोलताय? ५० खोक्यांवरुन बच्चू कडूचं विरोधकांना थेट चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 20:26 IST

शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं. 

मुंबई - राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. त्यानंतर गुरुवारीही सत्ताधारी पक्षातील आमदार सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमा झाले आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात आले. बंडखोर आमदारांना पैसे घेतल्याच्या आरोपावरुन टार्गेट करण्यात येत आहे. त्यावरुन, आता बंडखोर नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच, विरोधकांचा आव्हानही दिलं आहे.

विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या ५० खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना शिंदे गटातील आमदारांकडून “सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके” असे पोस्टर झळकवण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर दिलं. आता, शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक शैलीत या टिकेचा समाचार घेतला. तसेच, विधानसभेच्या पायरीवर काय घडलं हेही त्यांनी सांगितलं. 

'मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते', असे म्हणत नाव न घेता आमदार अमोल मिटकरीवर निशाणा साधला. तसेच, '५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या', असं आव्हानच आमदार कडूं यांनी विरोधकांना दिलं आहे. 

त्या दिवशी पायऱ्यावर काय घडलं

विधानसभेच्या पायऱ्यावर दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाली, तेव्हा नेमकं काय घडलं, यावर बोलताना कडू म्हणाले की, आधी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी घोषणाबाजी सुरू केली होती. ते सुरू असताना राष्ट्रवादीचे आमदार तिथे अचानक आले. वास्तविक त्या पायऱ्यांवर कुणी आधीपासून नारेबाजी करत असेल, तर दुसऱ्याने जाऊ नये असा प्रघात आहे. पण, असं असताना जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे आमदार मागे उभे न राहाता गोल उभे राहिले. म्हणजे आधी त्यांनी चूक केली. उलट म्हणायला लागले की सत्ताधाऱ्यांना माज आला”, असा घटनाक्रम कडू यांनी सांगितला. 

टॅग्स :बच्चू कडूशिवसेनाआमदारराष्ट्रवादी काँग्रेसएकनाथ शिंदे