Maharashtra Latest News: पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनावर न्यायालयाने बंदी घातल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर टीका केली. बहुमतातले सरकार झोपले आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर दिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावर 'श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात', असे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एका पोस्टमधून आशिष शेलार यांनी ठाकरेंना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आज माघी गणेशोत्सवातील पीओपीच्या गणेश मूर्ती अडचणीत आल्यात, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना? कारण यांच्या पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बंद कसा पडेल याचेच प्रयत्न केले. लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत", अशी टीका शेलार यांनी केली.
तेव्हा बाजू मांडायला न्यायालयात गेले नाहीत - शेलार
आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, "गणेशोत्सव असो वा दहिहंडी उत्सव, ज्या ज्या वेळी अडचणीत सापडला तेव्हा हे कधीच त्याची बाजू मांडायला न्यायालयात गेले नाहीत. आजही जाणार असे सांगत नाहीत. हिंदू देव-देवता, मंदिर आणि उत्सव; विशेषतः अयोध्येतील राम मंदिर या सगळ्याचे हे विरोधक आहेत. टीकाकार आहेत."
तुमचा काय अधिकार आहे? शेलारांचा ठाकरेंना सवाल
"हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा यांना त्रास होतो. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाला ज्यांनी हात लावला नाही. जे अज़ान स्पर्धा भरवतात आणि ज्यांना 'भोंग्यांचा आवाज' हल्ली सुमधुर वाटतो आणि गणपतीची आरती हातात घेणे जे टाळतात. ते आता माघी गणेशोत्सवावर बोलतात? तुमचा काय अधिकार आहे?", असा सवाल शेलार यांनी ठाकरेंना केला आहे.
"हे सुखकर्ता.. दुखहर्त्या... तुझे हे ढोंगी, स्वार्थी भक्त आज जी तुझी 'आरती' करीत आहेत. ते म्हणजे निव्वळ ढोंग, ढोंग आणि ढोंग. महाराष्ट्रातील गणेशभक्त यांच्या पासून सावध झालाच आहे, आता गणपती बाप्पा तुही यांचे हे ढोंगी रुप पाहून घे रे महाराजा", अशा शब्दात आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.