“मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका”: आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:08 IST2025-05-26T15:07:52+5:302025-05-26T15:08:19+5:30
Aaditya Thackeray News: गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजपा सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

“मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका”: आदित्य ठाकरे
Aaditya Thackeray News: सोमवार सकाळपासून मुंबई, मुंबई उपनगर आणि लगतच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग वळवावे लागले आहेत. सायन, गांधी मार्केट, वडाळा, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचल्यामुळे हे मार्ग वळवण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाने सांगितले आहे. यातच भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी २७ मे २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अत्यावश्यक गोष्ट नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. यातच आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुंबईची तुंबई झाल्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.
गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजपा सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईत ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी साचले नव्हते, तिथे पाणी साचले आहे. २०२१/२२ मध्ये आम्ही ज्या हिंदमाता परिसराला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, तिथे पुन्हा एकदा पाणी साचले आहे. मुंबई महानगरपालिकेने वेळीच पाणी उपसा केला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट करत भाजपावर टीका केली.
मुंबईचा एवढा द्वेष का? भाजपाच्या निष्क्रियतेमुळे मुंबईकरांना मोठा फटका
गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकी नाका येथेही अशीच परिस्थिती होती. आता मुंबईचे असे अनेक भाग आहेत, जिथे भाजपाच्या निष्क्रिय कारभाराचा सामना करत असल्याचे आपण पाहत आहोत. भाजपाला मुंबईचा इतका द्वेष का आहे की त्यांनी मुंबईतील रस्ते अर्धवट उखडले आहेत, नालेसफाई केलेले नाही. पूर्वीपेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचले आहे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
दरम्यान, महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली. मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासनराजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहत आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी आहे. एका पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असे दिसतेय. मुंबईला लुटणा-या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाहीत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
The absolute apathy of the bjp government that controls the BMC for the past 3 years has led to Mumbai come to a standstill today.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 26, 2025
Mumbai has water logging in places that never saw water logged earlier.
The Hind Mata which was made water logging free by us in 2021/22, is now…