क्षुल्लक वादातून भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 14:23 IST2026-03-15T14:23:17+5:302026-03-15T14:23:36+5:30
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चालकासह प्रवाशाला पोलिसांनी अटक केली.

क्षुल्लक वादातून भररस्त्यात दुचाकीस्वार तरुणाची हत्या
मुंबई : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका दुचाकीस्वाराचा खून झाला. ही घटना शनिवारी सकाळी मालाड पश्चिम येथे घडली. बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत टॅक्सीचालक सत्येंद्र गुप्ता (२८) व प्रवासी सुनील पाल (२७) याला अटक केली.
मालवणी येथे राहणारा शारिक अन्सारी (२५) हा मालाड पश्चिम येथील एका डिजिटल मार्केटिंग कंपनीत काम करत होता. तो सकाळी ११:३० वाजता लिंक रोडमार्गे अंधेरीकडे जात होता. मालाड पश्चिम येथील इनऑर्बिट मॉलजवळील मिठ चौकी जंक्शन येथे अन्सारीची दुचाकी एका टॅक्सीला धडकल्याने वाद झाला. रागाच्या भरात दुचाकीस्वाराने हेल्मेटने टॅक्सीची काच फोडली. त्यामुळे संतापलेल्या गुप्ता याने धारदार वस्तूने अन्सारीवर वार केला. या वादात प्रवासी पाल हाही सहभागी होता.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून अन्सारीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून चालकासह प्रवाशाला पोलिसांनी अटक केली.