मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:35 IST2026-01-11T09:32:13+5:302026-01-11T09:35:43+5:30
Mumbai Police News: मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले. अंदाजे २ कोटी रुपये किमतीचे १६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशच्या विविध भागांतून जप्त करण्यात आले.

मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
Mumbai Police News: मुंबई पोलीस हे देशात नव्हे, तर जगात आपल्या शौर्यासाठी ओळखले जातात. अगदी साधा प्रश्न असो वा गंभीर गुन्हा असो, मुंबई पोलीस छडा लावल्याशिवाय राहत नाही, अशीच ख्याती आहे. हीच ख्याती वाढेल आणि मुंबई पोलिसांचा अभिमान वाटेल, अशी कमाल कामगिरी करून दाखवली आहे. जवळपास ३३ हजार ५१४ हरवलेले मोबाइल मूळ मालकांना परत करण्यात येत असून, केवळ उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणांतून तब्बल १६५० मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.
स्मार्टफोन काळाची गरज झाली आहे. अगदी दहा हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच स्मार्टफोन वापरणारे कोट्यवधी लोक आहेत. मुंबईसारख्या शहरांमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल फोनवर डल्ला मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वे स्थानक, बस, सार्वजनिक वाहतूक सेवा असो किंवा मॉल, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये असो मोबाइल कुठूनही लंपास केला जाऊ शकतो. त्यातही मुंबईसारख्या शहरात एकदा मोबाइल चोरीला गेला की, तो परत मिळणे अतिशय कठीण मानले जाते. या सगळ्या गोष्टींचा छेद देत मुंबई पोलिसांनी ज्यांचे मोबाइल चोरीला गेले, अशा अनेकांना एक सुखद धक्का दिला.
मुंबईत हरवले, उत्तर प्रदेशात सापडले
मुंबई पोलिसांनी एक्सवर एक पोस्ट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईत हरवले आणि उत्तर प्रदेशात सापडले. १,६५० फोन परत माघारी आणले, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. एका विशेष मोहिमेअंतर्गत, मुंबईत हरवलेले किंवा चोरीला गेलेले, अंदाजे २ कोटी रुपये किमतीचे १,६५० मोबाईल फोन उत्तर प्रदेशच्या विविध भागांतून जप्त करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत, असे मुंबई पोलीस म्हणाले.
दरम्यान, दूरसंचार विभागाच्या अंतर्गत असलेल्या सीईआयआर (CEIR) या पोर्टलद्वारे आयएमईआय (IMEI) क्रमांकांच्या माध्यमातून या फोनचा शोध घेण्यात आला. जप्त केलेले फोन पडताळणीनंतर मूळ मालकांना परत केले जात आहेत.
Lost in Mumbai.
— मुंबई पोलीस Mumbai Police (@MumbaiPolice) January 10, 2026
Found in Uttar Pradesh.
1,650 Phones Brought Back Home.
Under a special operation, 1,650 mobile phones worth approximately ₹2 crore, which were lost or stolen in Mumbai, have been recovered from various parts of Uttar Pradesh.
A total of 33,514 mobile phones… pic.twitter.com/W9LdysYMBe