>> मयुरी वाशिंबे
पंकज त्रिपाठी यांची 'क्रिमिनल जस्टीस' (Criminal Justice) ही वेब सीरिज आपल्या चौथ्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेहमीप्रमाणे, यावेळीही सीरिज हिट ठरली आहे. या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता साहित्य पानसरे (Saahitya Pansare) यानं नुकतंच लोकमत फिल्मीशी मनमोकळा संवाद साधला. या मुलाखतीमध्ये त्यानं पंकज त्रिपाठी, जीशान अय्यूब या अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तसेच सेटवरील खास आठवणीही त्यानं सांगितल्या.
या सीरिजमध्ये संधी कशी मिळाली?
ऑडिशन दिल्यानंतर माझी या सीरिजसाठी निवड झाली. खरं तर मी कोरोनानंतर कामाच्या शोधात होतो. तेव्हा मी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशनचे दोन ते तीन राऊंड झाले, त्यानंतर लूक टेस्ट झाली. ही प्रक्रिया जवळपास दीड ते दोन महिने चालली. त्यानंतर या पात्रासाठी माझं नाव नक्की झाल्याचं कळालं. 'क्रिमिनल जस्टीस' सीरिजचा प्रत्येक सीझन हा वेगळा आहे. साधारणपणे आपण पाहिलं तर एखाद्या सीरिजमध्ये प्रत्येक पात्र पुन्हा घेतलं जाईल, याची शक्यता कमी असते. पण, तिसऱ्या सीझनमध्ये काम केल्यानंतर पुन्हा मला चौथ्या सीझनसाठी कॉल आला, तेव्हा फार आनंद झाला.
क्रिमिनल जस्टिसला प्रचंड यश मिळालं आहे. इतक्या मोठ्या फ्रँचायझीमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
खूप मस्त अनुभव होता. चौथ्या सीझनमध्ये मोठे-मोठे कलाकार आहेत. एवढी मोठी फ्रँचायझी असल्यानं सेटअपही मोठा होता. मला दबाव असा आला नाही. पण, नक्कीच एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा एक भाग होत असल्यानं आव्हान होतं. एक चॅलेज होतं, पण मी त्यात काम करण्यासाठी तेवढाच उत्सुकही होतो. लोकांना आवडेल असं माझ्याकडून काहीतरी देण्याचा माझा प्रयत्न होता. त्या खूप चांगल्या भावना होत्या. तिसऱ्या सीझनमध्ये आदिनाथ कोठारे हे केस लिड करत होते. पण,चौथ्या सीझनमध्ये मी आणि कल्याणी मुळे केसवर काम करत आहोत. त्यामुळे खूप चांगली भावना होती. पुन्हा परत कल्याणी यांच्यासोबत एकत्र काम करताना एक वेगळीच उत्सुकता होती.
पहिल्यांदाच पोलिसाच्या भुमिकेत आहेत, त्यासाठी काही मेहनत घेतली का?
मला जेव्हा पात्राबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा हे स्पष्ट झालं की हा एक सरळवृत्तीचा, कायद्यानुसार चालणारा हा पोलिस आहे. त्यानंतर मग मी पुण्यात आणि मुंबईत ज्या पोलिसांना भेटलेलो, त्यांच्यातील मी चांगल्या गोष्टी घेतल्या आणि पात्र उभं करण्याचा प्रयत्न केला.
पंकज त्रिपाठी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? ते सेटवर कसे असतात?
ते खूप चांगले अभिनेते आहेत, त्यांचा हसतमुख असा स्वभाव आहे. उगाचच काही रडारड नाही, ते सेटवर आल्यावर सगळ्यांशी बोलायचे, मस्ती करायचे. ते अगदी सहजतेने काम करणारे आणि कलेवर प्रभुत्व असलेले अभिनेते आहेत. त्यांना माहिती असतं त्यांना काय आणि कसं करायचं आहे. त्यांचं इम्प्रोव्हायझेशन खूप चांगलं आहे. मला वाटतं तुम्ही जेवढं चांगलं काम करता, तेवढं ते सहज होतं. त्यांच्यासोबत काम करणं, म्हणजे ज्ञानात भर घालणारा अनुभव होता. सेटवर टेक्निकल काम सुरु असताना आम्ही बऱ्याचदा गप्पा मारल्यात, त्यांच्या व्हॅनिटीमध्येही आम्ही जायचो. मला त्यांच्याकडून लाईफ लेसन खूप मिळालेत.
जीशान अय्यूब यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
२०१८ मध्ये जेव्हा मी मुंबईत आलेलो, तेव्हा मी त्यांच्या थिएटर ग्रृपमध्ये सहभागी झालो होतो. जीशान अय्यूब आणि त्यांच्या पत्नी रसिका आगाशे यांचा एक थिएटर ग्रृप आहे, तर मी त्यांच्याबरोबर थिएटर करायचो. दिल्ली, अमृतसर, चंदीगढ या ठिकाणी आम्ही शो केले होते. त्यांच्याकडून मला खूप मार्गदर्शन मिळालंय. त्यानंतर जवळपास ५ ते ६ वर्षांनी आता त्यांच्याबरोबर या सीरिजमध्ये काम केलंय. आमचा एकत्र एक सीन सुद्धा आहे. मुंबईत त्यांच्या थिएटर ग्रृपचा भाग होणं आणि त्यानंतर आज त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करुन काहीतरी गाठल्याचा आनंद मला मिळाला.
रंगभूमी, मग टिव्ही, फिल्म आणि आता मोठ्या वेब फ्रँचायझीपर्यंत हा तुझा प्रवास राहिला, या संपूर्ण वाटचालीत एक अभिनेता म्हणून तुझ्यात झालेला सगळ्यात मोठा वैयक्तिक बदल तुला काय वाटतो?
खूप बदल झाला, पुण्यात जेव्हा मी एमबीए करत होतो, तेव्हा मी थिएटर आणि मॉडेलिंग चालु केलं होतं. त्यानंतर मी मुंबईत आलो. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मला काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यामुळे माझ्या व्यावसायिक दृष्टीकोनात मोठा बदल झालाय. गेल्या सात वर्षात एक अभिनेता म्हणून माझ्यात बऱ्याच सुधारणा झाल्यात, असं मला वाटतं.
तु या क्षेत्रात कसा आलास? तुला पहिल्यापासून अभिनेता व्हायचं होतं का?
लहानपणापासून अभिनेता होण्याची इच्छा होती. पण, माझ्या आसपास असं अभिनय क्षेत्रात काम करणारं नव्हतं. त्यामुळे ते exposure मिळालं नाही, सर्वकाही स्वप्नवत वाटायचं. अभिनय क्षेत्राबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. कॉलेजनंतर थिएटर करायला लागलो, अभिनय करताना मला आनंद मिळत होता. तेव्हा यातच करिअर करायचं हे ठरवलं. मग मी शिक्षण पुर्ण केलं आणि मुंबईत आलो. पुणे या शहरानं मला शिक्षण दिलं आणि मुंबईने मला पैसे कमवायचं शिकवलं.
या क्षेत्रात नकारही पचवावे लागतात. कधी- कधी शेवटच्या क्षणी रिप्लेस केलं जातं, तुझ्यासोबत कधी असं घडलं आहे का आणि त्याचा तु कसा सामना करतोस?
हो, माझ्यासोबत असं बऱ्याचदा घडलंय. इतर क्षेत्रासोबत मी तुलना करत नाहीये. पण, अभिनय क्षेत्र हे थोडं कठीण आहे, असं मला वाटतं. दररोज ऑडिशन द्यावे लागतात आणि हाती रिजेक्शन येतं. त्यामुळे नकार मिळाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी पुन्हा आनंदी चेहऱ्यानं ऑडिशन द्यावं लागतं. पुन्हा नवीन संधी शोधण्यासाठी थोडी हिंमत लागते. कधी-कधी तर असं होत की, शॉर्टलिस्ट झाल्यानंतर ते पात्र दुसऱ्या कुणाला तरी दिलं जातं. त्यामुळे या गोष्टींचा सामना करता आला पाहिजे, कारण 'माझ्यासोबत असं का झालं' हाच विचार करत बसल्यास, पुढची संधी गाठणं शक्य होणार नाही.
ओटीटीमुळे थिएटरमध्ये चित्रपट चालत नाहीत, असं वाटतं का?
ओटीटी नव्हतं, तेव्हा चित्रपट हा थिएटरनंतर टीव्हीवर यायचा. मला वाटतं जे मेकर्स आहेत, त्यांनी कटेंटवर भर दिला पाहिजे. हा कटेंटचा विषय आहे. चांगलं कटेंट असेल तर नक्कीच प्रेक्षक हे थिएटरकडे वळतात.
महाराष्ट्रीयन आहेस तर मराठीत काम करणार का? साऊथ इंडस्ट्रीत प्रयत्न केलेत का?
अजून तरी नाही. पण, मला मराठीत चांगल्या-चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करायला खूप आवडेल. जसं नागराज मंजुळे आणि महेश मांजरेकर आहेत. माझ्या कामाची सुरुवात ही हिंदीपासून झाली, त्याच लोकांमध्ये मी जास्त पसरलो. तिकडेच जास्त काम मिळालं. मराठीत अजून तेवढ कोणी अप्रोच केलेलं नाही. मला लव्हस्टोरी, कॉमेडी, अॅक्शन या सगळ्याच जॉनरमध्ये काम करायला आवडेल. साऊथ इंडस्ट्रीत मी अजून प्रयत्न केले नाहीयेत. कारण, तिकडे माझी काहीच ओळख नाहीये. मला तिकडेही काम करायचं आहे.