‘दिल संभल जा जरा’ मालिकेतील आपला सहकलाकार असलेल्या संजय कपूरला त्याचे अभिनयगुण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या भूमिकाच मिळाल्या नाहीत असे निकी अनेजा वालियाचे म्हणणे आहे. या दोघांनी ‘शानदार’ या चित्रपटात देखील एकत्र काम केले होते. तेव्हापासूनच तो एक चांगला कलाकार असल्याचे निकीचे म्हणणे आहे. या मालिकेमुळे पुन्हा एकदा संजयसोबत काम करायला मिळत असल्याने निकी सध्या खूपच खूश आहे. ती सांगते, “संजयबरोबर काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला आहे. त्याच्याबरोबर काम करताना मला त्याच्यात दडलेल्या सुप्त अभिनय क्षमतेची कल्पना येत आहे. संजयला त्याच्यातील अफाट अभिनयक्षमतेचा कस लागेल अशा भूमिकाच आजवर मिळालेल्या नसल्याने त्याला आपल्यातील अभिनयगुण सिद्ध करून दाखविता आलेले नाहीत.”
संजयच्या अभिनयकौशल्यामुळे प्रभावित झालेली निकी सांगते, “दिल संभल जा जरामध्ये तो खूपच छान काम करत आहे. त्याच्यासोबत काम करताना खूपच मजा येतेय. तो स्वभावाने खूपच चांगला असल्याने सेटवर नेहमीच खेळकर वातावरण असते. तो सेटवर नेहमीच वेळेवर येतो आणि तो अगदी व्यावसायिक आहे. त्याची ही गोष्ट मला खूप आवडते.”
‘अस्तित्व- एक प्रेमकहानी’ या मालिकेतील डॉ. सिमरन या व्यक्तिरेखेमुळे निकीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण त्यानंतर डॉ. सिमरनसारखी दुसरी सशक्त भूमिका निकीला ऑफर झाली नाही. त्यामुळे मालिकेत पुन्हा काम करण्यासाठी तिला तब्बल १० वर्षं वाट पाहावी लागली असे निकी सांगते. ‘दिल संभल जा जरा’ या मालिकेतील लैला रायचंदची व्यक्तिरेखा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून एक अभिनेत्री म्हणून निकीला आव्हानात्मक वाटल्यानेच तिने या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.