तिन्हीसांज म्हणजे दिवे लागणीची वेळ, लक्ष्मी यायची वेळ, एकंदरीत महाराष्ट्रीयन घरात ही खूप महत्वाची वेळ. येत्या ३० ऑक्टोबरपासून तिन्हीसांजेला महाराष्ट्रातल्या घराघरात विठूमाऊली अवतरणार आहेत. महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावर आधारित नवी मालिका ‘विठूमाऊली’ स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.
सुप्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांची कोठारे विझन या मालिकेची निर्मिती करत आहेत. या मालिकेतून लोकोध्दारासाठी अवतार घेतलेल्या विठ्ठलाची महती दाखवली जाणार आहे. तसेच विठ्ठलाचं रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी असलेलं नातंही उलगडणार आहे. एक आगळेवेगळे पौराणिक कथानक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत आहे. आता विठ्ठल भक्तांना तिन्हीसांजेला विठूदर्शन घडणार आहे.
आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर स्टार प्रवाहने या मालिकेची घोषणा केली होती. याआधी गणपतीच्या मुहुर्तावर 'येई हो विठ्ठले माझे माऊली ये' ही पारंपरिक आरती नव्या ढंगात सादर करण्यात आली होती. यात समीर परांजपे, रुपल नंद, उपेंद्र लिमये, प्रसिद्धी किशोर, हर्षदा खानविलकर, सुपर्णा श्याम, संकेत पाठक, नेहा पवार, रश्मी अनपट, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सायली देवधर, प्रसाद जवादे, संग्राम साळवी या सदस्यांनी एकत्र येत विठूमाऊलीची आरती केली. कोठारे व्हिजनचे महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांचा सुद्धा यात सहभाग होता. संगीतकार सुयोग चुरी यांनी ही आरती संगीतबद्ध केली होती. गौरव बुरसे, करण कागळे, पल्लवी केळकर आणि मीरा भालेराव यांना ही आरती गायली होती.
तिन्हीसांजेला घराघरात अवतरणार विठूमाऊली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 15:51 IST