ये उन दिनो की बात है या मालिकेत प्रेक्षकांना या मालिकेचे निर्माते शशी आणि सुमित मित्तलचीच प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. पहरेदार पिया की ही मालिका बंद झाल्याने शशी आणि सुमीत मित्तल यांना चांगलाच शॉक बसला आहे. पण भूतकाळ विसरून नव्या उमेदीने एक मालिका त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. याविषयी सुमित सांगतात, आम्ही आजवर आमच्या आयुष्यात अनेक अप अँड डाऊन्स पाहिले आहेत. आम्ही ब्रॉडकास्टिंग कन्टेंट कम्पलेंट काऊन्सिलला स्पष्टीकरण देऊनही ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर आम्हाला चांगलाच धक्का बसला होता. पण जे झाले ते विसरून आम्ही ये उन दिनो की बात है या मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. या मालिकेत प्रेक्षकांना माझी आणि शशीची प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. आमची भेट शाळेत झाली होती. तिथूनच या प्रवासाला सुरुवात झाली. मालिका पाहाणारे प्रेक्षक हे अधिकाधिक छोट्या गावातील असतात. त्यांना कुटुंबातील कथा पाहायला आवडतात. त्यामुळेच एक साधी प्रेमकथा या मालिकेत दाखवण्याचा आम्ही विचार केला आहे. या मालिकेद्वारे आम्ही नव्वदीचे दशक लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मालिकेत अशी सिंग आणि रणदीप राय हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यांचे आम्ही वर्कशॉप घेतले. नव्वदीचे दशक त्यांना समजवण्यासाठी आम्ही त्यांना कयामत से कयामत सारखे चित्रपट आणि चांदनीमधील काही गाणी दाखवली. या मालिकेची कथा प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे.
Also Read : जर कमी वयात झाले असेल आपले ‘लग्न’ तर ही बातमी नक्की वाचा !