चाहूल मालिकेमध्ये वाड्यातील सगळ्या बायका उत्साहात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार असून शारदा, जानकी शांभवीला देखील त्यांच्यासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला घेउन जाणार आहेत. याचदिवशी शांभवीच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे. तिला वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या रहस्याबद्दल एक चाहूल लागणार आहे आणि या रहस्यामागे असलेले गूढ उकलणार आहे. शारदा आणि जानकी वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाभोवती एक धागा तरंगताना त्यांना दिसणार आहे. सुत वडाच्या झाडाभोवती कोणीतरी गुंडाळत आहे हे पाहून शारदा, जानकी आणि इतर जमलेल्या बायकांना धक्का बसणार आहे. पण, हे सगळे होत असतानाच शांभवीच्या लक्षात येणार आहे की, वाड्यामधील भूत हे कोणी पुरुष अथवा लहान मूल नसून एक स्त्री आहे. त्यामुळे आता शांभवीचा निर्मलापर्यंत पोहचण्याचा प्रवास सुरू होणार आहे.
तर सरस्वती मालिकेमध्ये राघव परतल्यावर सरस्वतीचा आनंद द्विगुणित झाला आहे. सरस्वतीची इच्छा देवाने पूर्ण केली आहे त्यामुळे ती खूप खुश आहे. छानशी साडी नेसून तिने वटपौर्णिमा साजरी करायची ठरवले आहे. सरस्वतीची वटपौर्णिमेची पूजा निर्विघ्नपणे पार पडणार देखील आहे. पण त्यानंतर एक घटना घडणार आहे, ज्यामुळे तिला जबरदस्त धक्का बसणार आहे. कारण याचदिवशी सरस्वती समोर राघवचे एक वेगळे रूप समोर येणार आहे. राघव असे का वागत आहेत? मोठे मालक इतके कसे बदलले? नक्की यामागचे कारण काय आहे? या मागचे कारण शोधण्याचा आता सरस्वती प्रयत्न करणार आहे.