Join us  

पुन्हा कर्तव्य आहे: देवीच्या मंदिरात होणार वसू-आकाशची भेट? मालिकेत येणार ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 5:54 PM

Tv serial: नियती वारंवार वसू आणि आकाश यांना भेटवण्याचे संकेत देत आहे.

छोट्या पडद्यावर नुकतीच पुन्हा कर्तव्य आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष म्हणजे ही मालिका सुरु झाल्यापासून मालिकेतील काही रंजक किस्से प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. यामध्येच आता वसू आणि आकाश यांची भेट लवकरच होणार आहे. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणामुळे त्यांची चुकामूक होतांना दिसत आहे. परंतु, आता चक्क देवीसमोरच त्यांची भेट होणार आहे.

वसूने पुन्हा लग्न करावं यासाठी तिचे आई-बाबा तिच्या मागे लागले आहेत. यासाठी त्यांनी एक स्थळदेखील आणलं होतं. मात्र, जे स्थळ आणलं ते नीट पारखून न घेतल्यामुळे वसू नाराज आहे. इतकंच नाही तर पुन्हा लग्नाचा विषय नको असंही ती खडसावून सांगते. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच आहे.

वसूने पुन्हा लग्न करण्यास नकार दिल्यामुळे तिचे आई-बाबा देवीकडे साकडं घालायचं ठरवतात. तर दुसरीकडे ठाकूर कुटुंबसुद्धा देवीच्या दर्शनासाठी निघतात. मात्र, आकाश जाणार नसतो. यामध्येच स्टेशनवर बनी हरवतो आणि त्याची भेट आकाशसोबत होते. बनी स्टेशनवर राहिल्यामुळे आकाश त्याला घेऊन गाडीत चढतो आणि त्याला त्याच्या आजीकडे सोपवतो. आकाशने बनीला आणल्याचं वसूला कळतं त्यामुळे ती त्याचे आभार मानायला जाते. परंतु, यावेळी तिची आणि जयश्रीची भेट होते. यात वसूचं जयश्रीसमोर बॅड इंप्रेशन पडतं.

दरम्यान, आकाश आणि वसू यांचं कनेक्शन म्हणजे देवीने दिलेला कौल आहे असं अखिलला वाटतं. त्यामुळे जिच्या मुलामुळे आकाश देवीच्या दर्शनासाठी सोबत येतो आहे  तिच त्याची होणारी बायको आहे हे तो अवनील पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे. परंतु, एकाच देवीच्या मंदिरात जायला निघालेल्या वसू आणि आकाश यांची भेट होणार का? जयश्रीचा वसू बद्दलचा गैरसमज दूर होईल का?  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार