वटपौर्णिमेच्या मुहुर्तावर त्यांच्या आयुष्याची नवी नांदी होणार आहे. नकुशी आणि राधा यांच्या आयुष्यात काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही मालिकांच्या वटपौर्णिमा विशेष भागांची उत्सुकता आहे.
नकुशी या मालिकेत नकुशी आणि रणजित यांच्या नात्यात आता प्रेमाचा ओलावा निर्माण झाला आहे. नकुशीच्या आयुष्यात पूर्वी आलेल्या सौरभचे लग्न झाले आहे. तर, रणजितची पहिली बायको शेरनाझचे प्रकरणही आता संपले आहे. त्यामुळे रणजित आणि नकुशी या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. पहिल्यांदाच वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर नकुशीचे आयुष्य वेगळ्या वळणावर येऊन ठेपणार आहे. रणजित आणि नकुशीला एक गोड बातमी कळणार आहे. काय असेल ही बातमी, त्याचा रणजित आणि नकुशीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
तसेच, राधा आणि विलास यांचे नातं आता दिवसेंदिवस बहरत आहे. राधा आणि विलास यांच्या मध्ये आलेली नीला आता बाजूला झाली आहे. बयो आजीचा विरोध असतानाही विलास आणि राधा यांच्यातील मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आहे. त्यामुळे ही पहिली वटपौर्णिमा राधाचे आयुष्य बदलून टाकणार आहे. हा बदल 'विरा'साठी सकारात्मक आहे का, या बदलाला राधा कशी सामोरी जाते याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.