Join us  

'रात्रीस खेळ चाले ३'मध्ये माई आणि माधवची झाली दुर्दशा, अशी रंगणार नाईक वाड्याची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:06 PM

रात्रीस खेळ चाले मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या मालिकेच्या तिसऱ्या भागाच्या प्रोमोंनी पहिल्यापासून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिसऱ्या भागात काय पहायला मिळणार, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. 

'रात्रीस खेळ चाले ३'च्या पहिल्याच भागात केवळ अण्णा दिसले, तर फोटोत शेवंताची झलक पाहायला मिळाली. मात्र, या सगळ्यात प्रेक्षक नाईकवाडा सांभाळणारी ‘माई’ आणि कुटुंबातील इतर मंडळी शोधत होते. झी मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये माई आणि माधवची अवस्था पाहून प्रेक्षकांना त्यांची खूप दया आली. माईंचे वय झाले असून त्या मोलकरणीची कामे करत आहेत. त्यांनी वाडा न विकण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजही आपली मुले परत येतील, याची आस लावून बसल्या आहेत. तर माधवला वेड लागले असून तो भिका मागत रस्त्यावर फिरताना दिसतो आहे. 

अण्णा नाईकांच्या पापांमुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची पुरती वाट लागली आहे.

अतृप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदते घर रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको, इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्याची ही एक रंजक कथा असणार आहे. 

टॅग्स :रात्रीस खेळ चाले ३झी मराठी