मिहीर सोनी बिल्लू उस्ताद चित्रपटामध्ये झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 03:05 IST
बॉलीवूड आणि मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला पुण्यातील प्रसिद्धा कलाकार मिहीर सोनी हा आता सुवाहदन आंग्रे ...
मिहीर सोनी बिल्लू उस्ताद चित्रपटामध्ये झळकणार
बॉलीवूड आणि मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला पुण्यातील प्रसिद्धा कलाकार मिहीर सोनी हा आता सुवाहदन आंग्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या बिल्लू उस्ताद या आगळ्यावेगळ्या चित्रपटामध्ये बिल्लू ही मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये मिहीर अखिलेंद्र मिश्रा, प्रियांशू चॅटर्जी, दीपराज राणा, मिथिला नाईक आणि के.के. गोस्वामी यांसारख्या बॉलीवुडच्या कलाकारांबरोबर काम करणार आहे. बिल्लू उस्ताद हा लहान मुलांच्या दहशतवादावर भाष्य करणारा पहिलाच चित्रपट आहे. हा चित्रपट नारायन फिल्मच्या वतीने सादर केला जात आहे. त्याची निर्मिती श्री. शंतनू सिंग यांची आहे. या चित्रपटाचे निर्माते श्री. शंतनू सिंग म्हणाले की, संकल्पनेवर आधारित असलेल्या चित्रपटांवर माझा विश्वास आहे. हा चित्रपट सामाजिक आशयाचा असून तो अनाथआश्रमातील मुलांच्या जीवनावर आधारित आहे. सुवाहदन आंग्रे हा उत्तम दिग्दर्शक असून, त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. आमची एक चांगली टीम तयार झाली आहे. "आम्हाला आमच्या चित्रपटातून नेमकी कोणती गोष्ट सांगायची आहे, याबाबत शंतनू सिंग आणि माझा दृष्टीकोन एकसारखाच आहे. तसेच, मला माझ्या मनातील असा हा चित्रपट करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद होत आहे. हा चित्रपट प्रेक्षक निश्चितपणे उचलून धरतील, याची मला खात्री आहे. तसेच, या चित्रपटामुळे समाजात तसेच, अनाथाश्रमातील मुलांच्या आयुष्यातही बदल घडतील अशी आशाही आहे," असे या चित्रपटाचे दिग्दर्शक सुवाहदन आंग्रे यांनी सांगितले. बिल्लू उस्तादमधील गाणी कैलाश खेर आणि वैशाली सामंत यांनी गायली आहेत. श्रीरंग अरस यांनी त्याला संगीत दिले आहे, तर सचिन निमक आणि दिव्येश मुंग्रा यांनी गीतांची रचना केली आहे. "बिल्लू उस्ताद" ही एका अनाथाश्रमामध्ये राहणाऱ्या बिल्लू या मुलाची आणि त्याच्या मित्रांची गोष्ट आहे. बिल्लू हा शूर आणि आत्मविश्वास असलेला तसेच आजुबाजूला घडणाऱ्या घटनांचे भान असणारा मुलगा आहे. तो त्याच्या चार मित्रांबरोबर खेळतो, हसतो आणि मारामारी देखील करतो.पण बिल्लूच्या मित्रांचे दहशतवाद्यांकडून अपहरण होते आणि कथानक वेगळेच वळण घेते. हे दहशतवादी बिल्लूच्या मित्रांना ब्रेन वॉश करून दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडले जाते. बिल्लू आयएएस ऑफिसर अजय आणि एटीएस ऑफिसर सिराज यांच्या मदतीने दहशतवाद्यांचा सामना करतो.